वाळवा तालुक्यात तिळगंगा नदीच्या पुनरूज्जीवनाचे काम सुरू राज्यातील सिंचन वाढविण्यासाठी मदत करणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या अभियानांतर्गत सिंचन योजनांना पूरक ठरेल, अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. आवश्यक तिथे नदी, नाले, ओढे यांचे खोलीकरण करण्याची कामे सुरू आहेत. शासन निर्णयाप्रमाणे राज्यात सर्वाधिक कल्पक आणि वैविध्यपूर्ण कामे सांगली जिल्ह्यात झाली आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले. वाळवा तालुक्यातील पेठ येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिळगंगा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाअंतर्गत कर्मयोगी बाबा आमटे स्मृती टायर बंधारा कामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. आनंदवन महारोगी सेवा समिती वरोरा (जि. चंद्रपूर) अंतर्गत आनंदवन समाजभान अभियान आणि ग्रामप्रकाश स्वराज बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लोकसहभागातून हे काम हाती घेण्यात आले आहे. या वेळी आमदार शिवाजीराव नाईक, आनंदवन समाजभान अभियानाचे कौस्तुभ आमटे, भाई संपतराव पवार, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव पी. एल. शदे, जिल्हा परिषद कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे, वाळव्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रूपाली सरनोबत आदि मान्यवर उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अग्रणी नदीचे पुनरूज्जीवन, नाले, ओढे खोलीकरण अशी अनेक कल्पक कामे केले असल्याचा दाखला देऊन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी प्राप्त होईपर्यंतचा कालावधी वाया जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याला जोडणारे मधले ओढे आणि नाले खोलीकरण करण्याचा प्रयत्न आहे. तिळगंगा नदी पुररूज्जीवन हा लोकसहभागातून हाती घेतलेला नवीन प्रयोग आहे. त्याला सर्वानी साथ द्यावी, असे आवाहन करून आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, केवळ पाणी न अडविल्यामुळे आणि न जिरवल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेने पाणी अडविले, जिरवले आणि काटकसरीने वापरले तर अधिक क्षेत्र ओलिताखाली येईल. याचा पिकांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना लाभ होईल, असे स्पष्ट करून आमदार शिवाजीराव नाईक यांनी शेतकऱ्यानी शेतीसाठी प्रवाही पध्दतीने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे, असे आवाहन केले. कौस्तुभ आमटे म्हणाले,की दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे शास्त्रीय पध्दतीने नियोजन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. पाणी अडविणे व जिरवण्यासाठी आनंदवन येथे टायर वापरून आठ छेटे-मोठे बंधारे बांधण्यात आले आहेत. आनंदवन प्रकल्पाबाहेरील पहिला उपक्रम पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात पेठ येथे होत आहे. याचा अर्थ या प्रयोगाला मान्यता मिळाली आहे, याबद्दल आमटे यांनी विशेष ऋणनिर्देश व्यक्त केले. प्रभारी कुलसचिव डॉ. पी. एल. शिंदे यांनी या कामात शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन. एस. एस.) विद्यार्थ्यांचा पूर्णपणे सक्रिय सहभाग मिळेल, अशी ग्वाही देऊन कूपनलिकेचे घातक परिणाम विशद केले. जनतेने गावात पूर्णपणे कूपनलिका बंद करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. इंद्रजित देशमुख म्हणाले,की संकटात भारतीय व्यक्ती नेहमीच मदतीची भूमिका घेते. त्यामुळे भविष्यात २०५० साली निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय स्थितीच्या संकटाचा विचार करून आपण सर्वानी पुढील पिढीला जगण्यास योग्य वातावरण टिकवले पाहिजे व निर्माण केले पाहिजे असे सांगितले. या वेळी भाई संपतराव पवार, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडीक यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रकाश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डी. जी. खोत आणि हरीहर कुलकर्णी यांनी केले. आभार संगीत विशारद पंडीत लोहार यांनी मानले. या कार्यक्रमास विविध अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.