रविवारी ’जय मल्हार’ मालिकेत खंडोबा आणि बानू यांचा विवाह सोहळा दाखविला जात असताना पुराणात खंडोबा आणि बानू यांचा विवाह सोहळा ज्या नळदुर्गमध्ये पार पडला. तेथे हजारो भाविक वऱ्हाडी म्हणून दाखल झाले. शोभेच्या दारूकामासह फटाक्यांची आतषबाजी, महाप्रसाद, खंडोबाला महाअभिषेक असे कार्यक्रम झाले. यानिमित्ताने नळदुर्ग नगरी नववधूप्रमाणे नटली होती.छोटय़ा पडद्यावर खऱ्या नळदुर्गमध्ये नव्हे तर मुंबईच्या फिल्मसिटीत स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य सेटवर हा विवाह सोहळा झाला. परंतु नळदुर्गमध्ये यानिमित्ताने हजारो भाविक दाखल झाले. या भाविकांची समजूत अशी होती की हा विवाह सोहळा नळदुर्गमध्येच होणार आहे. भाविकांनी नळदुर्गमध्ये येऊन सकाळी खंडोबाच्या मंदिराला पुष्पहार आणि तोरणे बांधली. सोलापूरपासून ४६ किलोमीटर अंतरावर असलेले नळदुर्ग प्राचीन व मध्ययुगीन काळात एक महत्वाचे ठिकाण होते.