‘शून्य कचरा’ व्यवस्थापन मुख्य सूत्र पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज अधोरेखित करणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २७ व २८ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अॅडव्होकेट विलास पाटणे आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आज येथे या महोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकाराने हा महोत्सव महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये आयोजित करण्यात येतो. त्यात सुमारे २५ शहरे सहभागी होतात. कोकण विभागात फक्त रत्नागिरी शहरातील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित विशिष्ट विचारांचा प्रसार करणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामध्ये यंदा ‘शून्य कचरा’ व्यवस्थापन हे महोत्सवाचे मुख्य सूत्र आहे. राष्ट्रीय सागरी संशोधन संस्था (पणजी) येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोले यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात घनकचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ कौस्तुभ ताम्हणकर (ठाणे) यांना ‘वसुंधरा मित्र’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच महोत्सवानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन होणार आहे. त्यानंतर गेला पागोस बेटांवरील ज्वालामुखीवर आधारित बॉर्न ऑफ फायर हा खास लघुपट सादर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी ३ ते ६ या वेळात राधाबाई शेटय़े सभागृहात वाढत्या नागरीकरणाच्या पाश्र्वभूमीवर विविध प्रकारच्या कचऱ्याची समस्या मांडणारे लघुपट प्रदर्शित होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी महोत्सवाचे दोन्ही दिवस दुपारच्या सत्रात खास लघुपट दाखवण्यात येणार असून शहरातील आठ प्रमुख शाळांमध्ये जाऊन ते सादर केले जाणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२८ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता एमआयडीसीमधील गद्रे मरिन एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भेट आयोजित करण्यात आली आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन किंवा पुनर्वापराचे कंपनीमध्ये राबवले जात असलेले उपक्रम पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. त्या दिवशी सकाळी व दुपारच्या सत्रात लघुपट दाखवण्यात येणार असून संध्याकाळी साडेचार वाजता होणाऱ्या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘वसुंधरा सन्मान’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्रात घनकचरा व सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन किंवा पुनर्वापर करणाऱ्या गद्रे मरिन एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची यंदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.