कोकण रेल्वे मार्गावर नवीन ११ रेल्वे स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. तसेच दुपदरीकरण आणि विद्युतीकरणबाबत प्रक्रिया सुरू असून पावसाळी हंगामाला तोंड देण्यासाठी रेल्वेने तजवीज केली असून, रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. वैभववाडी-कोल्हापूर हा ११० किमी रेल्वे मार्ग मध्य व भारतीय रेल्वे महाराष्ट्र रेल्वे विकास बोर्डाच्या माध्यमातून करणार असून, तीन हजार २०० कोटी खर्च अपेक्षित आहे अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयाचा दोन वर्षांत विकास करण्यासाठी झपाटय़ाने पावले टाकली आहेत असे संजय गुप्ता म्हणाले. रेल्वेचे महाप्रबंधक सिद्धेश्वर तेलगू व रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक बी. बी. निकम यावेळी उपस्थित होते. सावंतवाडी टर्मिनसचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा वेळ घेऊन लवकरच उद्घाटन केले जाईल. दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमात रेल्वेला पाण्याची सुविधा, तिकीट बुकिंग इमारत व अन्य पायाभूत सुविधा देण्यात येईल असे संजय गुप्ता म्हणाले. रेल्वेने १८२ व ९००४४७०७०० हे नंबर आपत्कालीन वेळी हेल्पलाईन म्हणून ठेवले आहेत असे गुप्ता म्हणाले. वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे हे काम जलदगतीने होईल. मध्य रेल्वे व भारतीय रेल्वे मिळून प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनदेखील आर्थिक सहकार्य करील. या ११० किमी मार्गाला तीन हजार २०० कोटी खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र रेल्वे विभाग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून रेल्वेचा विकास होईल असे संजय गुप्ता म्हणाले. कोकण रेल्वे बंदरे जोडणारा प्रकल्प राबविणार आहे. बंदरे विकास जलद गतीने झाल्यास रेल्वेने जोडण्याची रेल्वेची तयारी आहे असे गुप्ता म्हणाले. रेल्वेचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी भांडवलाचा प्रश्न नसून विद्युतीकरण करण्यासाठी ठेकेदार निवडला जाईल. तसेच ११ स्थानके विकास झाल्यावर दुपदरीकरण होईल तोवर रोहा ते वीर हा ४६ किमी.चे दुपदरीकरण हाती घेतले जाईल असे संजय गुप्ता म्हणाले. कोकण रेल्वे मार्गावर ११ रेल्वे स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील नऊ स्थानके आहेत. त्यात रायगड तीन, रत्नागिरी चार व सिंधुदुर्ग दोन अशी संख्या आहे. रायगड इंदापूर, गोरेगाव, सापेबामणे, कळंबोली, पोमेंडी, खारेपाटण, आर्चिणे व कसाल यांचा समावेश आहे. कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर कोकण मेवा स्टॉल सुरू केले आहेत. येत्या रेल्वे हमसफर सप्ताह १ जूनपासून सूरू होत असून केंद्र रेल्वे मंत्रालयाच्या दोन वर्षांनिमित्त हा सप्ताह आहे. सोलर प्लॅन्टने सावंतवाडी, रत्नागिरी अशा स्थानकात विजेचा प्रश्न सोडविला जात आहे. रत्नागिरीत ३५० व्ॉटचा सेलर प्लँट बसविला आहे, असे ते म्हणाले. कोकण रेल्वे आयटी प्रकल्प विकसित केला जात असून रेल्वेचे कामकाज ई ऑफिस म्हणून करण्यात येत असल्याने ६० टक्के कागद बचत केली जात आहे. ठेकेदारीदेखील ई टेंडरिंगच आहे. कुडाळ, कणकवली व सावंतवाडी ही महत्त्वाची स्थानके मानून विकास करण्यात येत आहे, असे सांगतानाच महिला कोचची खबरदारी संवेदनशील स्वरूपातच घेतली जाईल असे ते म्हणाले. कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी खबरदारीसाठी ९५० लोक गस्ती पथकात नेमले आहेत. या मार्गावर ३६ संवेदनशील भाग आहेत. १० जून ते ३१ ऑक्टोबर या काळात पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे धावणार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेगदेखील कमी करण्यात येईल असे संजय गुप्ता म्हणाले. पनवेल येथे टर्मिनस झाल्यावर कोकण रेल्वे व पुणा मार्गावरील गाडय़ांना दिशा मिळेल. या ठिकाणाहून गाडय़ा सुटतील असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर स्टेशनवर गाडय़ांची गर्दी झाली आहे. तेथे जादा कोचच्या गाडय़ांना पाग व्यवस्था नाही. त्यामुळे राज्यराणी, जनशताब्दी गाडय़ांना कोच वाढविता येत नाहीत, तसेच दिवा गाडी पुढे नेता येत नाही अशी अडचण गुप्ता यांनी सांगितली.