आगामी चिपळूण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झालेले जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यासारख्या बहुरंगी, बहुढंगी आणि सर्वगुणसंपन्न व्यक्तीबद्दल आता साहित्यिकांनीच निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी आज तोफ डागली.
जलसंपदा खात्यातील घोटाळ्यांमुळे तटकरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण गेल्या काही दिवसांत संमेलनाची संयोजन समिती आणि खुद्द तटकरे यांनी कौशल्याने या विरोधाची धार बोथट केली होती. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनाला गती मिळेल, असे वाटत असतानाच आज पालकमंत्री जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना या वादाला पुन्हा तोंड फोडले. सध्या या संमेलनाबाबत जे काही चालले आहे ते साहित्याच्या परंपरेला, शिस्त आणि सभ्यतेला धरून नाही, अशी टिप्पणी करून पालकमंत्री म्हणाले की, काही लोकांनी कंबरेचे सोडून डोक्याला बांधायचे ठरवले तर आपण कसे वागायचे हे आपणच ठरवायचे असते. तटकरेंनी गटबाजी चालवली आहे. आपल्याच पक्षाला डावलून परस्पर कार्यक्रम घेण्याचा सपाटा चालवला आहे. त्याबाबतच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत. माजी आमदार रमेश कदम यांची तर ‘मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी’ अशी अवस्था आहे. या घडामोडींमुळे तालुक्यातील, जिल्ह्य़ातील सामान्य साहित्यप्रेमी दु:खी आहे.
तटकरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख कार्यवाह प्रकाश देशपांडे आणि प्रकाश काणे माझ्याकडे चर्चेसाठी आले होते. तेव्हा मी त्यांना सर्वतोपरी साहाय्याचे आश्वासन दिले होते, असा गौप्यस्फोट करुन जाधव म्हणाले की, त्यानंतरच्या घडामोडींचा मात्र या उभयतांनी मला थांगपत्ता लागू दिला नाही. उलट मीच सहकार्य न केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगून माझी बदनामी केली. तटकरेंच्या निवडीनंतर ते मला भेटले तेव्हा ते कोणताही खुलासा करू शकले नाहीत. तसेच रत्नागिरी जिल्ह्य़ात या पदासाठी अनेकजण पात्र असताना हा मान का डावललात, या प्रश्नाचेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या संमेलनाचे उद्घाटक असले तरी ते येतील किंवा नाही, याबाबत मी काही सांगू शकत नाही, पण सध्याच्या सर्व घडामोडींची ते योग्य दखल घेतील अशी खात्री आहे. आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेले असल्याचे जाधव यांनी उद्वेगाने नमूद केले आणि यापुढे मात्र आपण गप्प राहणार नाही, असेही सूचित केले.    

तटकरे-राणे-कदम विरुद्ध भास्कर जाधव</strong>
कोकणच्या राजकारणात उद्योगमंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री जाधव यांच्यात अधूनमधून उसळणारा शाब्दिक संघर्ष सर्वज्ञात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गतही तटकरे आणि जाधव यांच्यात कोकणातील वर्चस्वासाठी सतत स्पर्धा राहिली आहे. त्यामध्ये चिपळूण नगर परिषदेच्या मागील निवडणुकीत जाधव यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सरशी झाली, तर जाधव गटाने केलेली बंडखोरी अंगलट आली. तेव्हापासून जाधव आणि कदम यांच्यातील वितुष्टही तीव्र झाले आहे. त्यामुळे सध्या येथील राजकारणात तटकरे-राणे-कदम विरुद्ध पालकमंत्री जाधव असे चित्र दिसत आहे, असे जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले असता, ‘तुम्हाला याचा अभिमान वाटायला हवा,’ अशा शब्दांत जाधव यांनी सहमती दर्शवली.