‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी रत्नागिरी विभागातून पाच संघांची आज निवड करण्यात आली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (शिल्पकोष्टक), डीबीजे महाविद्यालय, चिपळूण (तात्यांची कृपा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड (आम्ही तुझी लेकरे), राजेंद्र माने अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, आंबव (रसिक) आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ (मैत) या महाविद्यालयांच्या संघांचा त्यामध्ये समावेश आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अॅकॅडमी, पुणे’ आणि ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या यंदा तिसऱ्या वर्षी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमधून सहा महाविद्यालयांच्या संघांनी या स्पध्रेत भाग घेतला. येथील पटवर्धन हायस्कूलच्या भागोजी कीर सभागृहात दिवसभर चाललेल्या या स्पध्रेला महाविद्यालयीन युवक-युवतींचा उदंड उत्साहात उत्तम प्रतिसाद लाभला. जुन्या सामाजिक रूढींशी आधुनिक विचारांचा संघर्ष, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जातिभेद आणि आर्थिक विषमतेचा बालमनावर होणारा परिणाम व त्यावरील सकारात्मक प्रतिक्रिया इत्यादी विषय या एकांकिकांमधून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच त्या संदर्भात सामाजिक संदेशही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या कलाकारांनी मनापासून प्रयत्न केला. दिवसभर रंगलेल्या या प्राथमिक फेरीसाठी नीलकंठ कदम आणि डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच स्पध्रेतील प्रतिभावान तरुणांना व्यावसायिक मनोरंजन क्षेत्रात संधी देण्याच्या हेतूने आयरिस प्रॉडक्शनचे विद्याधर पाठारे व विवेक रानवडे हेही या फेरीसाठी आवर्जून उपस्थित होते. या स्पध्रेची विभागीय अंतिम फेरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात येत्या १३ डिसेंबर रोजी रंगणार आहे. अशा स्वरूपाच्या कोणत्याही स्पध्रेचे परीक्षक सर्वसाधारणपणे काहीही न बोलता केवळ स्पध्रेतील एकांकिकांचे व कलाकारांचे मूल्यमापन करून आपला निकाल संयोजकांना सादर करतात; पण या स्पध्रेच्या परीक्षकांनी प्रत्येक संघाच्या सादरीकरणानंतर कलाकार आणि दिग्दर्शकांशी अतिशय अनौपचारिक पद्धतीने संवाद साधत संबंधित एकांकिकांच्या गुण-दोषांची मनमोकळेपणाने चर्चा करून सुधारणांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. स्पध्रेत सहभागी झालेल्या बहुसंख्य कलाकारांच्या सामाजिक जाणिवा अतिशय तीव्र आणि नाटय़विषयक समज प्रगल्भ असल्याचे मत परीक्षक डॉ. बांदिवडेकर यांनी व्यक्त केले. राज्याच्या अन्य भागातील विद्यार्थी कलाकारांच्या तुलनेत ते कुठेही कमी वाटले नाहीत. जास्त चांगले मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास निश्चितच उत्तम नाटय़ाविष्कार करण्याची त्यांची क्षमता आहे. तसेच या सादरीकरणाला येथील मातीचा वास असल्याची टिप्पणी केली. बहुसंख्य कलाकारांनी या स्पध्रेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचे मत नीलकंठ कदम यांनी व्यक्त केले.