काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी सिंधुदूर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी रविवारी 'अशोक चव्हाण हे कुरघोडीचे राजकारण करत आहेत. इतकेच नाही तर चव्हाण महाराष्ट्रात काँग्रेस संपविण्याचे काम करत आहेत' असा सनसनाटी आरोप केला. कालही कुडाळमध्ये राणे यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. राणेंनी अशोक चव्हाणांवर केलेल्या काँग्रेस संपवण्याच्या आरोपाबद्दल ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने ट्विटवर पोलच्या माध्यमातून वाचकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. २३ तास चाललेल्या या पोलमध्ये एक हजार २००हून अधिक नेटकऱ्यांनी आपली मते नोंदवली. त्यापैकी ५८ टक्के म्हणजे जवळजवळ ७०० जणांनी अशोक चव्हाण यांच्या बाजूने कौल दिला. म्हणजेच 'लोकसत्ता ऑनलाईन'च्या ५८ टक्के वाचकांनी नारायण राणे यांचा आरोप चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर ४२ टक्के म्हणजेच ५०५ वाचकांनी राणेंचे म्हणणे बरोबर असून, अशोक चव्हाणांमुळेच काँग्रेसला राज्यात उतरती कळा लागल्याचे मत व्यक्त केले. 'लोकसत्ता ऑनलाईन'चा हा पोल २१ वेळा रिट्विट झाला असून राणे समर्थक आणि अशोक चव्हाण समर्थकांनी या पोलवर ट्विटच्या माध्यमातून आपली मतेही मांडली. #LokSattaPoll: अशोक चव्हाण @AshokChavanINC महाराष्ट्रात काँग्रेस संपविण्याचे काम करत आहेत हा नारायण राणेंचा @MeNarayanRane आरोप पटतो का? — LoksattaLive (@LoksattaLive) September 18, 2017 काँग्रेसमधील वाद आणखी किती चिघळणार हे येणारा काळच सांगेल. मात्र सध्यातरी 'लोकसत्ता ऑनलाईन'च्या वाचकांनी आपले मत अशोक चव्हाणांच्या पारड्यात टाकून राणेंची बाजू कमकुवत असल्याचे म्हटले आहे, असे या पोलमधून दिसते.