विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक राहिल्याने जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वच उमेदवार आपल्या विजयाची खात्री देत असले तरी ज्याने त्यांचे राजकीय भवितव्यच मतदान यंत्रामध्ये बंदिस्त करून ठेवले आहे, तो मतदार राजा मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दावे-प्रतिदावे यावर मनातल्या मनात हसताना व त्यांची कीव करताना दिसत आहे.
जिल्ह्यातील विधानसभेच्या ५ पकी शिवसेनेकडे ३ व राष्ट्रवादीकडे २ जागा आहेत. शिवसेनेखालोखाल या जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आता हे वर्चस्व याही वेळी कायम राहावे, किंबहुना त्यात एखाद्या जागेची वाढ व्हावी अशी रास्त अपेक्षा सेना व राष्ट्रवादीची मंडळी बाळगून आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस व भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांच्या पाटय़ा गेल्या काही वर्षांपासून कोऱ्या करकरीत असून त्यावर या वेळी एखादी तरी पांढरी रेघ उमटावी अशी या पक्षांच्या मंडळींची अपेक्षा आहे. आजच्या मतमोजणीनंतरच शिवसेना व राष्ट्रवादीच्या वर्चस्वाचा, तर भाजप व काँग्रेसच्या अस्तित्वाचा फैसला होणार आहे. दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या विधानसभेच्या पाच जागांसाठी बुधवारी (१५ ऑक्टोबर) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ३९ हजार २०१ सर्वसाधारण मतदारांपकी ७ लाख ९६ हजार ९५९ (सरासरी ६४.३१ टक्के) जणांनी मतदानाचा हक्क बजावला. पाच जागांसाठी एकूण ४४ उमेदवार निवडणूक लढवीत असून त्यात प्रामुख्याने माजी मंत्री व राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, माजी पालकमंत्री शिवसेनेचे उदय सामंत, शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी, सदानंद चव्हाण, राजन साळवी, भाजपचे माजी आमदार बाळ माने व विनय नातू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, मनसेचे वैभव खेडेकर या दिग्गजांचा समावेश आहे. दापोली-मंडणगड मतदारसंघात शिवसेनेचे आ. सूर्यकांत दळवी, राष्ट्रवादीचे संजय कदम, भाजपचे केदार साठे, काँग्रेसचे सुजित झिमण, मनसेचे वैभव खेडेकर, बसपाचे ज्ञानदेव खांबे, राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार किशोर देसाई यांच्यासह एकूण १० जण िरगणात आहेत. या मतदारसंघातील एकूण २ लाख ६३ हजार ८६ सर्वसाधारण मतदारांपकी १ लाख ६१ हजार ६५० (६१.४४ टक्के) जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून आज रविवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी उपविभागीय कार्यालय, दापोली येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गुहागर-खेड मतदारसंघात माजी मंत्री राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू, शिवसेनेचे विजयकुमार भोसले, काँग्रेसचे संदीप सावंत व बसपाचे सुरेश गमये हे पाच जण निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातील एकूण २ लाख २७ हजार ७०९ सर्वसाधारण मतदारांपकी १ लाख ५१ हजार ४८७ (६६.५३ टक्के) जणांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील मतमोजणी राममंदिर हॉल, श्रीदेव गोपाळकृपा माध्यमिक विद्यामंदिर येथे होणार आहे.
चिपळूण मतदारसंघात शिवसेना आ. सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे शेखर निकम, भाजपचे माधव गवळी, काँग्रेसच्या  रश्मी कदम, बसपाचे प्रेमदास गमरे यांच्यासह १० उमेदवार आहेत. एकूण २ लाख ४९ हजार ११२ सर्वसाधारण मतदारांपकी १ लाख ६६ हजार ६२० (६६.८९ टक्के) मतदारांनी मतदान केले. मतमोजणी गुरुदक्षिणा हॉल, युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये होणार आहे.
रत्नागिरी मतदारसंघात माजी पालकमंत्री शिवसेना उमेदवार उदय सामंत, भाजपचे माजी आमदार बाळ माने, राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुझा, काँग्रेसचे रमेश कीर, बसपाचे दिनेश पवार यांच्यासह १० जण उभे आहेत. एकूण २ लाख ६५ हजार २२५ सर्वसाधारण मतदारांपकी १ लाख ७४ हजार ६३६ (६५.८४ टक्के) मतदारांनी मतदान केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव येथे मतमोजणी होणार आहे.
राजापुरात शिवसेनेचे आमदार राजन साळवी, काँग्रेसचे राजेंद्र ऊर्फ राजन देसाई, भाजपचे संजय यादव, राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव, बसपाचे अनंत कांबळे, अ. भा. िहदू महासभेच्या प्रमिला भारती यांच्यासह एकूण ८ उमेदवार आहेत. या मतदारसंघातील एकूण २ लाख ३४ हजार ६९ मतदारांपकी १ लाख ४२ हजार ५६६ (६०.९१ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लांजा तहसीलदार कार्यालयात मतमोजणी होणार आहे. युती व आघाडीचे संसार मोडीत काढल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी हे चार प्रमुख पक्ष स्वबळ अजमावीत असल्याने त्यांना मतविभाजनाचा फटका बसणार आहे. त्यामुळे नक्की कोणता उमेदवार विजयी होणार, याबाबत ठामपणे सांगण्यास कोणीही धजावत नाही. दापोलीत सेनेचे आमदार सूर्यकांत दळवी या वेळी विजयाचा षटकार मारण्यात यशस्वी होणार की त्यांचा षटकार हुकणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. गुहागरामध्ये राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जाते, तर चिपळुणात राष्ट्रवादीचे शेखर निकम व सेनेचे सदानंद चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत झाल्याने निकम किंवा चव्हाण यांपकी एक जण निसटत्या बहुमताने विजयी होतील. राजापुरातून शिवसेनेचे राजन साळवी पुन्हा निश्चित विजयी होतील, तर रत्नागिरीचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. उदय सामंत आणि बाळ माने हे दोन प्रतिस्पर्धी या वेळी तिसऱ्यांदा समोरासमोर आले असून गेल्या दोन निवडणुकांमध्ये माने यांचा सामंत यांनी पराभव केला होता. आता या वेळी उदय सामंत विजयाची हॅट्ट्रिक करतात की बाळ माने आपल्या पराभवाची हॅट्ट्रिक खंडित करतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.