आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये सोमवारी मराठा क्रांती मूक मोर्चासाठी मोठा जनसागर रस्त्यावर उतरला. त्यात युवती आणि महिलांचा लक्षणीय सहभाग होता. जिल्ह्य़ातील याआधीच्या सर्व मोर्चांच्या गर्दीचे उच्चांक या मोर्चाने मोडीत काढले. काटेकोरपणे नियोजन केल्यामुळे गर्दी होऊनही अतिशय शांततेत व शिस्तबध्द पध्दतीने मोर्चा पार पडला. कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा करावी, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती आणि शिक्षण व नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे शेकडो फलक घेऊन मोर्चेकरी रस्त्यावर उतरले. सकाळपासून वाहने शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास युवती, लहान मुले व महिला यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरवात झाली. अंधारे चौक, नगरपालिका चौक, नेहरु पुतळा, हाट दरवाजा, सोनार खुंट, आंबेडकर पुतळा, नवापूर चौफुलीमार्गे मोर्चा नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हे अंतर गाठण्यासाठी तब्बल चार तासांचा कालावधी लागला. नंदुरबार जिल्ह्यात मराठा समाज सात ते आठ टक्के असला तरी जवळपास ४० हून अधिक संघटनांनी मोर्चाला पाठिंबा देत नागरिक त्यात सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले. मोर्चातील पाच युवतींनी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील प्रांगणात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. व्यासपीठावर केवळ पाच युवतींना स्थान देण्यात आले. या युवतींनी कोपर्डीतील पीडितांच्या व्यथा मांडल्या. तसेच प्रारंभी मराठी आणि नंतर अहिराणी भाषेतून आपल्या मागण्यांचे निवेदन वाचन केल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. मोर्चासाठी ७०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आ. सुधीर तांबे, चंद्रकांत रघुवंशी, हेमंत देशमुख, राजवर्धन कदमबांडे, बबनराव थोरात यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली.