मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमी व म. प्र. संस्कृती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भरारी मराठी माणसाची’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे भोपाळ येथे आयोजन केले होते.  मध्य प्रदेशात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या, आपल्या अंगच्या गुणांनी आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा दोनदिवसीय मेळावा, भोपाळ येथील रवींद्र भवनात संपन्न झाला. या मेळाव्यातील मुख्य कार्यक्रमात, विशेष अतिथी  म्हणून लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन उपस्थित होत्या.

पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात, म. प्रदेशातील ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती अनुराधा जामदार, श्रीपाद जोशी, लोकसत्ता मराठी जगतच्या प्रतिनिधी आणि जागतिक मराठी परिषदेच्या सचिव रेखा दिघे, प्रतीक्षा डॉट कॉमच्या वृशाली शिंदे, डॉ. मोहन बांडे आणि म. प्र. मराठी साहित्य अकादमीचे तडफदार निर्देशक अश्विन खरे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्ज्वलन संपन्न झाले. अश्विन खरे यांनी दीप प्रज्ज्वलनानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संगीता पारनेरकर, अमृता माणके, अरुणा परांजपे, मंजिरी काळे यांनी सादर केलेल्या ‘ओम् नमो जी आद्या’ या पदाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर कवी कथाकारांच्या दर्जेदार कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनिल निगुडकर यांनी आपली हास्य कविता ‘जगावे की मरावे’ ऐकवून श्रोत्यांना हसवले. तर पुरुषोत्तम सप्रे, चंद्रशेखर तापी, अनुराधा जामदार, चेतन फडणीस, राधिका इंगळे इ.च्या भावपूर्ण कवितांना रसिकांची पसंती लाभली. श्रीनिवास कुटुंबळे यांच्या मराठी गौरवगाथालादेखील प्रतिसाद मिळाला. वृषाली शिंदे यांनी ‘ओघळलेली ती एक सर’ ही कविता प्रभावीपणे सादर केली. अपर्णा पाटील यांनी ‘दे थोडा विसावा’ म्हणून, अविश्रांत श्रम घेणाऱ्या सर्व माऊलींना आदरांजली दिली. मेघना साने यांनी ‘मोनिकाचा फोटो सेशन’ कथेचे साभिनय कथाकथन केले. यादव गावळे यांचे गीत, विवेक सावरीकर, रामचंद्र किल्लेदार यांच्या रचना, संध्या गद्रे यांची ‘आई’, शालिनी इंदूरकर यांची ‘घंटय़ाचा झाला गजर’, श्योपुरकर यांच्या कविता आणि रवींद्र भालेराव यांचे कथाकथन इत्यादींनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

दुसऱ्या दिवशी ‘कलावंतांचा संवाद’ हे परिचर्चेचे सत्र, ज्येष्ठ तबलावादक आणि संगीतकार पं. किरण देशपांडे यांच्या अध्यक्षतेत पार पडले. परिचर्चेत राजन देशमुख, पराग छापेकर, श्रीराम उमडेकर, कुळकर्णी इत्यादींचा सहभाग होता.  कलावंतांच्या संवादानंतर कनक श्रीभट आणि अमृता माणके यांनी ‘मध्य प्रदेश गीत’ सादर केले. मुख्य कार्यक्रमाला आदरणीय सुमित्राताई महाजन, लोकसभा अध्यक्षा यांनी दीप प्रज्ज्वलन करून सुरुवात केली. रिवाजाप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन अश्विन खरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याला मंजूषा जोहारी यांच्या समर्थ संचालनाची जोड मिळाली. मध्य प्रदेशात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींचे मानपत्र देऊन सुमित्राताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आले.  मध्य प्रदेशात अनेक संस्था अथवा व्यक्ती आहेत, जे अतिशय उत्तम कामगिरी करताहेत. त्यांच्याही भराऱ्या उंचच आहेत. परंतु आज इथे प्रातिनिधिक स्वरूपात काही सत्कार संपन्न झाले आहेत, असा खुलासाही मंजूषा जोहारी यांनी अकादमीच्या वतीने केला. अल्पावधीत मायबोलीच्या संवर्धनासाठी लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल अकादमीचे तरुण, तडफदार निर्देशक अश्विन खरे यांचे अध्यक्षांनी मनापासून कौतुक केले. ‘मध्य प्रदेशाला नाटक, संगीत, साहित्य, संस्कृती इ. सर्वाचीच एक परंपरा लाभली आहे. मध्य प्रदेश सांस्कृतिकदृष्टय़ा सशक्त आहे. आज गरज आहे ती ठोस पावले उचलण्याची. याकरिता एकत्र येणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी शाखा स्थापन झाल्या पाहिजेत. एकत्र आल्याने प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाईल. सर्व विविध क्षेत्रांतील मंडळी एकत्र आल्यामुळे बाहेरून अतिथी बोलावण्याची गरजही भासणार नाही.’ अशा खुमासदार भाषेत, मराठी माणसाने खऱ्या अर्थाने कोणत्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे याबद्दल सुमित्राताईंनी स्पष्टीकरण केले. यावेळी जबलपूरच्या महापौर स्वाती गोडबोले यादेखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. दुपारच्या सत्रात, प्रतीक्षा डॉट कॉमच्या वृषाली शिंदे यांनी आपल्या मराठी वेबसाइटची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनने माहिती दिली. सर्व साहित्यिक, रसिकांना या प्रकल्पात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. श्रोत्यांनी विचारलेल्या शंकाचे त्यांनी समर्थपणे निरसन केले.

‘असा गवसला सूर..’

‘भरारी मराठी माणसाची’ यानिमित्ताने संगीत संध्येचे आयोजन भोपाळ येथे केले होते. माळव्यातील प्रथितयश गायक, गीतरामायणकार म्हणून ओळखले जाणारे अभय माणके यांच्या संगीत संयोजनाखाली ‘मध्यगुंज’ हा दर्जेदार संगीत मैफलीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रतलाम, देवास, खांडवा, ग्वाल्हेर, उज्जन, इंदूर अन् भोपाळच्या तरुण ज्येष्ठ, श्रेष्ठ गायकांनी भाग घेतला. नाटय़पद, गझल, भजन, लावणी असे एकामागून एक गीतप्रकार सादर करून सुरांची उत्तम मेजवानी दिली. खांडवा भोपाळच्या मुकेश बनसोडेने ओंकारस्वरूपा, इंदूरच्या कनक श्रीभट यांची मर्मबंधातली ठेव, सुधाकर देवळे यांची राग देहाची बंदिश इत्यादींनी श्रोत्यांची वाहवा मिळवली. ग्वाल्हेरची चिमुकली वल्लरी मोघे हिने ‘मन मंदिरा’ हे कठीण गाणे लीलया सादर करून वन्स मोअर मिळवला. माधव भागवत यांच्या गझल गायनाने कार्यक्रमाला बहार आणली. याचबरोबर भावगीत, भक्तिगीत, नाटय़गीत, लावणी असे एकापेक्षा एक गाणी सादर करून सर्वच गायकांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली. या उत्तम श्रवणीय मैफिलीची सांगता भा.रा. तांबे यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ या अजरामर गीताने, कनक हिच्या दमदार गाण्याने झाली.

श्रोत्यांपर्यंत ही सुरांची बरसात मैफील समर्थपणे पोहोचविण्याचे काम निरजा आपटे यांनी आपल्या खुमासदार शैलीने केले. मधून मधून प्रत्येक प्रसंगाला साजेसा एखादा शेर ऐकवत त्यांनी कार्यक्रमाला अधिकच बहार आणली.

‘रंग माझा वेगळा’(रेखा नाईक)

बेंगळुरू महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहात पर्यावरणतज्ज्ञ उल्हास राणे यांचा ‘रंग माझा वेगळा’ हा पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच समर्पक असा कार्यक्रम सादर केला गेला. मंडळात इकोफ्रेन्डली गणपती बसविण्याची सुरुवात राणे यांच्यामुळेच झाली. निसर्ग आणि राणे असे एक समीकरणच मनात कोरलं गेलं आहे. ‘रंग माझा वेगळा’ या कार्यक्रमात राणे यांनी वेगवेगळ्या स्लाइडस् दाखवीत अत्यंत सौम्य पद्धतीने हा महत्त्वाचा विषय हाताळला. कार्यक्रमाची सुरुवात ‘हरित मानव’ या महात्मा गांधीच्या संकल्पनेने झाली. बेंगळुरू सकट सर्वच मोठय़ा शहरांचे सगळे रंग धूसरच! असा विचार मांडीत त्यांनी हरित शहराच्या संकल्पनाबद्दल विवेचन करीत असतानाच ‘संतुलित भू वापर’ आणि ‘सर्व समावेक्षक अशा संतुलित धोरणाची’ही चर्चा केली. वैयक्तिक पातळीवरदेखील निसर्गाबद्दल असलेली त्यांची संवेदनक्षमता, प्रेम आणि दक्षता त्यांच्या विवेचनातून जाणवत होती. अत्यंत समर्पक पद्धतीने मांडलेला ‘रंग माझा वेगळा’ हा कार्यक्रम सर्वच प्रेक्षकांना अंतर्मूख करायला लावणारा असा ठरला.

फक्त शब्दांतूनच नव्हे तर आता कृतीतूनही आपली जबाबदारी व्यक्त करण्यासाठी, औषधी वनस्पतींची वाटप करण्याची समर्पक कल्पना कार्यक्रमाची गुणवत्ता वाढवून गेली.

-रेखा गणेश दिघे

rakhagdighe@gmail.com