मराठी विश्वकोशातील माहितीची अधिग्राहय़ता फार मोठी आहे. विश्वकोशाची निर्मितीच फार मोठय़ा संशोधनातून झालेली आहे, यामुळे मराठी विश्वकोश विकीपीडियावर आणायचे की नाही या बाबत अजून संभ्रम असून, त्यासाठीचा विचारविनिमय सुरू असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तावडे यांनी मराठी विश्वकोश कार्यालयाला नुकतीच भेट दिली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की मराठी विश्वकोशाबाबत संशोधक आणि अभ्यासकांमध्ये फार मोठी विश्वासार्हता आहे. पूर्ण अभ्यासानंतरच विश्वकोशातील नोंदी होतात. नोंद बदलण्यासाठी व त्याबाबत खात्री करण्याचीही एक विशिष्ट अशी पद्धत आहे, यामुळेच विश्वासार्हतेबाबत कायम चच्रेत असणाऱ्या विकीपीडियावर विश्वकोश आणावयाचा की नाही याबाबत अजून चर्चा सुरूच आहे. विश्वकोशासह साहित्य संस्कृती मंडळात कमीतकमी हस्तक्षेप राहील अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. यातील तज्ज्ञ आणि अभ्यासकांना पूर्णत: स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. राजकीय व्यवस्थेची पूर्ण ताकद मराठी भाषा विभाग, साहित्य संस्कृती मंडळ आदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. विश्वकोशासाठी वीस ज्ञानमंडळे स्थापन करून त्यांच्याकडे गुणवत्ता वाढवणे, वेग वाढवून विश्वकोश निर्मितीचे काम अद्ययावत ठेवणे असे धोरण आहे. मराठी विश्वकोश निर्मिती हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम असल्याने त्यात पूर्ण अभ्यासाअंती अंतिम स्वरूप येत असते. काळाबरोबर बदलत्या संगणकीय महाजालात गतीने जावे लागेल. महनीय व्यक्तींनी केलेले काम समाजासाठी खुले झाले पाहिजे. वाईला संशोधक, अभ्यासक आणि लेखकांचे विश्वकोशात जाणे-येणे असते. त्यांना सोयीसुविधा मिळतील असा प्रयत्न आहे. आपल्या पूर्वजांनी केलेले काम जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाईतील विश्वकोशाची अत्याधुनिक इमारतीचे काम लवकरात लवकर सुरू होईल. पुस्तकांच्या गावाच्या उभारणीत मराठी विश्वकोशाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी मोलाचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. सरोज मिठारी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, प्रा वर्षां तावडे, विजय मालवणकर आदी उपस्थित होते. डॉ जगतानंद भटकर यांनी स्वागत करून मनोगत व्यक्त केले.