लोकशाहीच्या वऱ्हाडासाठी निमंत्रण पत्रिका तयार करण्याची अनोखी शक्कल हिंगोलीच्या तहसीलदारांनी लढविली आहे. ५० टक्केच मतदान झालेल्या क्षेत्रात ही विवाहपत्रिका पाठविण्यात आली आहे. मतदार वरपक्षात आणि लोकशाही वधूपक्षात अशी विभागणी करण्यात आली आणि पत्रिकेच्या शेवटी तळटीप टाकण्यात आली- ‘आहेर स्वीकारू नये.’
िहगोली शहरातील एका भागात केवळ ५० टक्के मतदान झाले होते. मतदान वाढवावे यासाठी जागृतीचे अनेक उपक्रम घेण्यात आले, पण फारसा उपयोग होत नव्हता. त्यामुळे विवाहपत्रिका छापण्यात आल्या आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी दीड लाख पत्रिकांचे वितरण करण्यात आले. १५ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाचा मुहूर्त कळविण्यात आला आहे.
तहसील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना निवडणूक लग्नपत्रिका सोपविण्यात आल्या. अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघर जाऊन या पत्रिकांचे वाटप करणार आहेत. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी होती, तेथेही या पत्रिका दिल्या जातील. िहगोली विधानसभा मतदारसंघात एकूण ३२२ मतदान केंद्र असून सुमारे २ लाख ८६ हजार मतदार आहेत. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले होते.