नगराध्यक्षांकडून सविस्तर निवेदन सादर कराड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी द्यावा. तसेच पालिकेच्या प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाने केली. डॉ. भोसले व शिंदे यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सदर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, नगरसेवक घन:श्याम पेंढारकर, नगरअभियंता एम.एच.पाटील यांची उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की, शहरात समाविष्ट झालेल्या वाढीव भागातील भुयारी गटर योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी १२ कोटी, शहर व वाढीव भागातील रस्त्यांसाठी १० कोटी, गटर्सबांधकामासाठी १० कोटी, अंतर्गत रस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची ४ इंच पाणी पुरवठय़ाची पाईप टाकण्यासाठी ५ कोटी, वैशिष्टय़पूर्ण योजनेतून मंजूर झालेले दीड कोटीचे अनुदान सुवर्ण जयंती योजनेत वर्ग करावे, विशेष अनुदानांतर्गत वाढीव भागातील सोईसुविधांसाठी अनुज्ञेय अनुदान वर्ग करावे, घरकचरा व्यवस्थापनासाठी ५ कोटी रुपये मिळावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील पुतळय़ालगत पार्किंग इमारत बांधण्याच्या कामासाठी ३ कोटींचे अनुदान मंजूर आहे. हे अनुदान खर्च करण्यासाठी मुदतवाढ मिळावी तसेच अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अखर्चित असलेला ९३ लाख रुपयांचा निधी खर्च करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळणे गरजेचे आहे. यावेळी मागण्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.