औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपतो आहे. त्यांची शेवटची सर्वसाधारण सभा होती. औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय नगरसेवक जाब विचारत होते. नियमित पाणी पुरवठा करण्याचीही मागणी करण्यात आली. जेवढी पाणीपट्टी वसूल केली जाते त्याच पद्धतीने पाणीही पुरवले जावे असे शिवसेनेने सूचित केले. यावर एमआयएमकडून आक्षेप घेण्यात आला. शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. याचवेळी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन आणि जफर बिल्डर हे दोघे राजदंड पळवण्यासाठी पुढे सरसावले.

ज्यानंतर या दोघांना अडवण्यासाठी सुरक्षा रक्षक पुढे गेले. त्यांना मागे सारत आणतानाच या दोघांनी खुर्च्या फेकण्यास सुरूवात केली. हा प्रकार पाहून महापौर सुरक्षा रक्षकांच्या जवळ गेले तेव्हा एक खुर्ची त्यांच्या डोक्यावर पडली. या प्रकारानंतर सय्यद मतीन आणि जफर बिल्डर या दोघांचे नगरसेवक कायमचे रद्द करण्यात आले. याआधी ‘वंदेमातरम’ च्या मुद्द्यावरून  पालिकेत राडा झाला होता. त्या राड्यातही याच दोन नगरसेवकांचा पुढाकार होता. सोमवारी झालेल्या राड्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी या दोघांना सभागृहाच्या बाहेर काढले आणि कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.