फलकबाजीमुळे पुन्हा एकदा ‘घरवापसी’च्या चर्चेत आलेले भाजपचे माजी केंद्रीय संघटनमंत्री संजय जोशी यांनी संघटनेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ‘मनकी बात’ करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमुळे जगभरात भारताचा सन्मान वाढल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी व संजय जोशी यांच्यातील वितुष्ट अलीकडे पोस्टरबाजीमुळे गाजले होते. संजय जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी फटकारले होते. एवढेच नव्हे तर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या स्वीय साहाय्यकाची पदावरून हकालपट्टी करण्याचे निर्देश शहा यांनी दिले होते. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य असल्याचे सूचित करतानाच संजय जोशी यांनी अखेपर्यंत संघटनेच्या हितासाठी कार्यरत राहणार असल्याचा दृढ निश्चय प्रकट केला आहे. या पत्रकावर भाजपच्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.