लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नागपूर कार्यालयाने सिंचन क्षेत्राचे ८५ टक्के उद्दिष्ट गाठून सिंचन क्षेत्र विकासात राज्यात आघाडी मिळवली आहे. २०११-१२ च्या खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात प्राधिकरणाने अडीच लाख हेक्टर क्षेत्रात सिंचन करून हे उद्दिष्ट साध्य केले आहे.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ांत ३ लाख, ४ हजार ८३० हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्याचे लक्ष्य ठेवले होते. यामध्ये खरीप हंगामात १ लाख, ९८ हजार, ८१० हेक्टरचे उद्दिष्ट ठरले होते. प्राधिकरणाने १ लाख, ६७ हजार, ७९२ हेक्टर क्षेत्रात सिंचन करून ९० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. रब्बी हंगामात ८० हजार, ८१० हेक्टरचे उद्दिष्ट असताना ६८ हजार, ९३१ हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले आहे. उन्हाळी हंगामात २५ हजार २१० हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्याचे उद्दिष्ट लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला देण्यात आले. प्राधिकरणाने १३ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रात सिंचन केले आहे.
पेंच, बाघ, इटियाडोह आणि निम्न वेणा या मोठय़ा प्रकल्पातून पिकांसाठी पाणीपुरवठा करण्यात आला. पेंच प्रकल्पातून १ लाख, ४ हजार, १६० हेक्टरमध्ये सिंचनाचे उद्दिष्ट होते. या प्रकल्पात ९१ हजार ९४९ हेक्टरमध्ये सिंचन करण्यात आले. या चार मोठय़ा प्रकल्पातून तिन्ही हंगामात १ लाख, ७९ हेक्टर, २६० हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट देण्यात आले. यातून १ लाख, ५४ हजार २४५ हेक्टर क्षेत्रात सिंचन करून प्राधिकरणाने ९० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.  नागपूर जिल्ह्य़ातील चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकरानाला, वेणा, कान्होलीबारा, पांढराबोडी आणि सायकी मकरधोकडा या दहा मध्यम प्रकल्पातून लाभक्षेत्र विकासासाठी शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी सोडण्यात आले. मध्यम प्रकल्पांतर्गत २५ हजार, १९५ हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट असताना १७ हजार, १२० हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले आहे.  भंडारा जिल्ह्य़ातील बघेडा, बेटेकर बोथली, चांदपूर, सोरना आणि गोंदिया जिल्ह्य़ातील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंदा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर या प्रकल्पांमधून पिकांना पाणी सोडण्यात आले. सिंचनासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना प्राधिकरणाने पाणीपुरवठा केला आहे. काही शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीमुळे पाणी पुरवठा करण्यात आला नाही. नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ातील लघु प्रकल्पांचाही सिंचनात मोठा वाटा आहे. लघु प्रकल्पांतून ५६ हजार, ४३८ हेक्टरमध्ये सिंचनाचे उद्दिष्ट असताना ४२ हजार, ४४० हेक्टरमध्ये सिंचन करून उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.