देशातील मोदी लाट आता ओसरली असून या वेळच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. भाजपचे खरे रूप आता शिवसेनेला कळले असा टोलाही त्यांनी लगावला.
 सुनील तटकरे यांनी रोहा तालुक्यातील दुरटोली येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत लोकांनी मोदींच्या नावावर मतदान केले. परंतु या नावाचा करिष्मा आता राहिलेला नाही.
 मतदानाला मिळत असलेला संथ प्रतिसाद याचे द्योतक आहे. आघाडी तुटली असली तरी राज्यातील राजकीय स्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे येईल. गरज पडल्यास समविचारी पक्षांना एकत्र सोबत घेऊ. आमची लढाई सेना भाजपबरोबर असल्याने त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे तटकरे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे खरे रूप आता शिवसेनेला उमगले आहे. सामनातील आजच्या लेखातून ही बाब समोर आली आहे. उशिरा का होईना शिवसेनेला याची जाणीव झाली असा टोलाही तटकरे यांनी लगावला.