सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.
त्यांनी गेली चार वर्षे या पदाला न्याय दिला. त्यांच्याकडे काही तालुका काँग्रेस अध्यक्षांनीही राजीनामे दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे काम सुरू होते. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांचा पराभव लोकसभा निवडणुकीत झाला. जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढला. त्यात नारायण राणे यांचा पराभव झाला तर सावंतवाडीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. राणे यांचा पराभव जिव्हारी लागणारा ठरला. मात्र कणकवली मतदारसंघातून स्वाभीमानी संघटना अध्यक्ष नितेश राणे यांचा विजय काँग्रेसला दिलासा देणारा ठरला.
राणे पीता-पुत्रांनी या निवडणुकीत विजयासाठी निवडणूक लढूनही पित्याचा पराभव तर पुत्राचा विजय झाला होता. त्यामुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
काँग्रेस पक्षाचे जिल्ह्य़ाचे राजकारण आता आम. नितेश राणे यांच्या हातात आले आहे. त्यांनी मताधिक्य देणाऱ्यालाच संघटनेच्या पदाची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेस आता कात टाकण्याच्या तयारीत आहे. संघटनेत नव्या दमाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना स्थान मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाला ऊर्जितावस्था देण्यासाठी वडिलांच्या आशीर्वादाने आम. नितेश राणे प्रयत्न करणार आहेत.