छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिल्लीस्वारांना हादरून सोडले. त्यानंतरदेखील महाराष्ट्राने अनेक नेते दिले. ज्यांचा दिल्लीत दबदबा होता. आज दिल्लीचे तक्त हादरू शकेल असा नेता महाराष्ट्रात नाही. शरद पवार एक अजब नेते आहेत ते कधी कुणाबरोबर असतील हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातून चांगले नेते तयार होत नाहीत, ही खेदजनक बाब आहे, असे प्रतिपादन जनता दल युनायटेडचे (जेडीयू) अध्यक्ष शरद यादव यांनी केले.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) उमेदवार पंडित पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत शरद यादव बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात भांडवलशाही आणू पाहतायत. शेतकऱ्यांपेक्षा त्यांना उद्योजक प्यारे आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या उद्योजकांना द्यायच्या आहेत. या देशातील शेतकरी उद्ध्वस्त करून हा देश उद्योजकांच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. देश संकटात आहे. हा देश भांडवलदारांच्या हातात जाण्यापासून रोखला पाहिजे, असे शरद यादव म्हणाले.
देशात माफियांचे राज्य आले आहे. त्यांच्याविरुद्ध हातात शस्त्र घेऊन लढण्याची गरज नाही. मतदान केंद्रावर जाऊन मतदानाद्वारे त्यांना धडा शिकवला पाहिजे. सर्वानी एकजुटीने लढले पाहिजे, असे यादव म्हणाले.
डावे आणि समाजवादी एकत्र येऊन राज्यात पुरोगामी आघाडी आम्ही केली आहे. ही आघाडी २८८ जागा लढविणार आहेत. रायगडातदेखील आम्ही सर्वजागा लढवत आहोत.
लोकसभेत गाफील राहिलो तसे विधानसभा निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. जिद्दीने कामाला लागा, रायगडात भगवा झेंडा फडकवा, असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.    रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार मीनाक्षी पाटील, विधानसभा उमेदवार पंडित पाटील, प्रा. एस. प. जाधव, कॉ. अशोक ढवळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.