शहरातील महापालिकेच्या विविध उद्यानांत दररोज साचणाऱ्या हरित कचऱ्याचे संकलन करून उद्यान विभागामार्फत शहरातील ३१ उद्यानांत गांडूळ खतनिर्मिती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. शहरातल्या ९० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर गांडूळ खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून प्रस्तावित आहे. महापालिकेच्या उद्यानात दररोज कचरा साचत राहतो. त्यामुळे या कच-याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न नेहमी पडतो. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी याबाबत पुढाकार घेत शहरातील उद्यानांत गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. पंचवटीतील रासबिहारी लिंकरोडवरील प्रमोद महाजन उद्यानात प्रायोगिक तत्त्वावर या खतनिर्मिती प्रकल्पास शुभारंभ झाला. उद्यानात तयार होणारा हरित कचरा त्याच ठिकाणी साचवला जाऊन त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर त्या ठिकाणी गांडूळ खतनिर्मिती केली जाईल. याच खताचा वापर उद्यानातील विविध वृक्ष वाढीसाठी केला जाणार आहे.