गेल्या वर्षीच्या तुलनेत पंढरपूरमध्ये भाविकांच्या संख्येत वाढ राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली असली तरी अशा या रणरणत्या उन्हातही तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठय़ा प्रमाणत येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली. राज्यात अनेक शहरांत तापमानाने चाळिशी पार केली आहे. याला पंढरपूरही अपवाद नाही. मात्र सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १७ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत दोन लाख २४ हजार भाविकांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले आहे. यामध्ये दररोज भाविकांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी इतर दिवशी पेक्षा हजार ते दीड हजार जास्त भाविक दर्शन करून गेले आहेत. गेल्या वर्षी याच कालवधीत जवळपास १ लाख ९० हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. म्हणजेच ४४ हजार भाविकांनी गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी दर्शनाला आले आहेत. या शिवाय श्री विठ्ठलाचे दर्शन ऑनलाइन बुकिंग करूनही करता येते. १७ एप्रिल ते २७ एप्रिल या काळात जवळपास अडीच हजार बुकिंग झाले आहेत. पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीने विशेष काळजी घेतली आहे. मंदिराच्या परिसरात म्हणजेच पश्चिम द्वार ते व्हीआयपी गेट, व्हीआयपी गेट ते नामदेव पायरी, नामदेव पायरी ते तुकाराम भवन आणि तुकाराम भवन ते पश्चिम द्वार या ठिकाणी छत टाकले आहेत. या शिवाय या ठिकाणी भाविकांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नये म्हणून मॅटदेखील अंथरले आहेत. तसेच भाविकांना शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. एकीकडे सूर्यदेव आग ओकत असला तरी भाविक पंढरीला पसंदी देत असल्याचे चित्र आहे. उन्हाच्या त्रासापेक्षा दर्शनाने समाधान -ओझा आम्ही सहकुटुंब पंढरपूरला दर्शनासाठी आलो. आमच्या गावातबी उन्हाचे चटके बसत आहेत. पण पंढरपूरल जायचे ठरवले आणि आलो. दर्शन झाल्यावर समाधान मिळाले. उन्हाचा त्रास, उन्हाचे चटके हे काय बी जाणवले नाय असे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी या गावातील मुरलीधर ओझा या भाविकांनी सांगितले. मंदिर समितीच्या उपक्रमांना यश मंदिर समितीने भाविकांना उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. दर्शन रांगेतही थंड पाण्याची सोय केली आहे. साधारणता भाविकांना अर्धा ते पाऊण तासात देवाचे दर्शन होते. मंदिर समितीने पीपल काऊंटिंग मशीन बसवली आहे. याद्वारे दररोज किती भाविकांनी दर्शन घेतले याचा अचूक आकडा मंदिर समितीला उपलब्ध होत आहे. यावरून गेल्या वर्षीची तुलनेत भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली.