जिल्हा परिषद निवडणुकीत परळी आणि अंबाजोगाई गटात आणि पंचायत समिती गणांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहोत, असे सांगितले. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपने अपयश मिळवले असले तरी, जिल्हा परिषदेच्या परळी गट आणि तालुक्यातील पंचायत समिती गणात भाजपला पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे हा पराभव महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला आहे. निकाल जाहीर होताच पंकजा मुंडे यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. मतदारांना काय हवे आहे, याबाबत मला खरेच काही कळत नाही. मात्र, विकासकामे करूनही मतदारांनी भाजपला नाकारले आहे. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी परळीतील पराभव स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले असले तरी, त्यांनी दिलेला राजीनामा स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.