राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे विजयी झाले. महाराष्ट्रातील मतदानाचा विचार करता विरोधकांची किमान १० मते फुटल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसून येते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान १० सदस्यांनी मीरा कुमार यांना मतदान न करता सत्ताधारी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचं दिसते आहे. आता ही मतं काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेसची? अशी कुजबूज सुरु झाली आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत झाली. निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना २०८ मते मिळाल्याचे सांगण्यात येतं. तर दोन मते अवैध ठरली आहेत. मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास कोविंद यांना भाजप १२२, शिवसेना ६३ आणि त्यात अपक्ष १३ अशी एकूण १९८ मते मिळणे अपेक्षित होते. पण कोविंद यांना एकूण २०८ मते मिळाली आहेत. तर मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली आहेत. मतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास कोविंद यांना १० मते अधिक मिळाली आहेत. आता ही १० मते नक्की कोणती? ती मते काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेसची? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रामनाथ कोविंद यांच्याविषयीच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

विधानसभेतील एकूण जागा – २८८

राष्ट्रपतीपदासाठी मतदान – २८७

मीराकुमार यांना मिळालेली मते – ७७

रामनाथ कोविंद यांना मिळालेली मते – २०८

बाद ठरलेली मते – २

कोविंद यांना किमान १० मते जास्त मिळाली.