आत्ताच्या विधानसभा निवडणूक निकालावरुन भाजपची लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी घसरलेली आहे.आसाममध्ये कांॅग्रेसची प्रदीर्घ काळ सत्ता होती म्हणून तिथे सत्ता बदल झाला. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांबरोबर केलेली युती लोकांना आवडली नाही. एकूणच या निवडणुकीमध्ये भाजपलाही समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमासाठी ते आलेले असताना विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.या वेळी सातारा जिल्हा कांॅग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले उपस्थित होते. आसाममध्ये कांॅग्रेसची प्रदीर्घकाळ सत्ता होती. अशावेळी मतदार चांगल्या केलेल्या कामांकडेही कानाडोळा करतो आणि जनता सत्ता बदलाचा निर्णय घेते. येथे कांॅग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावाला जुन्या नेतृत्वाशी ,कार्यकर्त्यांशी जुळवून घेता आले नाही, त्याचा परिणाम सत्ता बदलात झाला. पूर्वेकडील एका राज्यात भाजपला प्रवेश मिळाला एवढेच त्याचे मूल्यमापन करता येईल.
ममता बॅनर्जी या पूर्वाश्रमीच्या कांॅग्रेस कार्यकर्त्यां आहेत. तेथे पक्ष स्वबळावर निवडणूक लढला असता तरी चालले असते. परंतु तेथे कम्युनिस्टांशी केलेली युती लोकांना आवडलेली दिसत नाही. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला. केरळमध्ये दर पाच वषार्ंनी सत्ता बदल होत असतो. तेथील सरकारवर आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्याची चौकशी सुरु होती.वेळेत चौकशी पूर्ण होऊ शकली नाही; मग त्याच गोष्टी लोकांना खऱ्या वाटायला लागतात. त्याचा परिणाम निवडणूक निकालांवर होतो. दक्षिणेतील राज्यात कॉंग्रेस आणि भाजपबद्दल उत्तर भारतीय पक्ष असा शिक्का तेथील लोकांमध्ये आहे.त्याचा परिणाम हे पक्ष तिथे रुजण्यामध्ये होतो. तिथल्या स्थानिक नेतृत्वानेही या पक्षांबद्दल अशीच प्रतिमा तयार केली आहे. त्याला दाक्षिणात्य राजकारणही कारणीभूत आहे.
छगन भुजबळांची चौकशी केंद्र सरकारकडून होत आहे. त्यांची चौकशी आत्ता पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती. मात्र सध्याचे सरकार ही चौकशी ताटकळत ठेवू पाहात आहे, जेणे करुन याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. भाजपा आणि सेनेच्या सरकारमध्ये सगळेच अलबेल नाही. शिवसेनेच्या नेतृत्वावर भाजपाचा विश्वास नाही. समजा शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला, तर सरकारला टेकू देणारा पक्ष भाजपाला हवा आहे. भाजपाची भिस्त त्यामुळेच राष्ट्रवादीवर आहे. त्यामुळेच एखादया गोष्टीची सारखी सारखी चर्चा घडवत ठेवण्याला त्यांचे प्राधान्य आहे.ऑगस्टा हेलीकॉप्टर चौकशी भाजपा सरकार लांबवताना दिसत आहे. त्यांना अनेक प्रश्न सोडविण्यात नाही, तर लांबविण्यात रस असल्याचेही ते म्हणाले.