अविश्वासाच्या प्रस्तावावर विरोधकांना रस्त्यावरही उत्तर देण्याच्या गृहमंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधान सभेत आज (बुधवार) दुस-या दिवशी गदारोळ झाला. आपण कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे सांगून आर.आर.पाटील यांनी सदनाची माफी मागण्यास नकार दिला. तर गृहमंत्र्यांनी माफी मागितलीच पाहिजे त्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावरून झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.
शिवसेनेने राज्य सरकार विरोधकात मांडलेला अविश्वास प्रस्ताव बारगळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच विधानसभेत मंगळवारी याच मुद्दयावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विरोधकांना, सभागृहातच काय रस्यावरही पाहिजे त्या पद्धतीने उत्तर देण्याचे खुले आव्हान दिले होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी आजही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत पाटील यांच्या माफिची मागणी केली. मात्र, त्यांनी सदनाची माफी मागण्यास नकार दिला.