एसटी आरक्षण प्रवर्गाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी अॅड. माधवराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा काढण्यात आला.
सर्वपक्षीय धनगर समाजाच्या आरक्षण कृती समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला या वेळी निवेदन देण्यात आले. घटनेच्या ४६व्या कलमानुसार महाराष्ट्रात एसटी प्रवर्गाच्या यादीत क्रमांक ३६वर धनगड ही जात समाविष्ट आहे. मात्र, धनगड ही जात वेगळी असल्याचे कारण देत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. परंतु केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाच्या २००७-०८पासूनच्या अहवालात अनुसूचित जातीच्या यादीत इंग्रजी प्रतीत क्र. ३६वर ‘ओरान, धरगर व देवनागरी प्रतीत धनगर असा उल्लेख’ असल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्रात धनगड ही जात अस्तित्वात नाही. धनगर हेच धनगड आहेत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. राष्ट्रपतींनी नेमलेल्या पहिल्या मागासवर्ग आयोगानेही धनगर समाजाला एसटी आरक्षणाची शिफारस केली आहे. या बरोबरच महाराष्ट्र सरकारनेही २६ जून १९६६ रोजी अशी शिफारस केंद्राकडे केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही.
गेल्या ६५ वर्षांपासून या समाजावर सतत अन्याय होत आहे. धनगर समाज अगोदरच एसटी प्रवर्गात आहे. फक्त अंमलबजावणी होत नाही म्हणून मुळातच अस्तित्वात असलेल्या धनगर समाजाच्या एसटी प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी अन्यथा सर्वपक्षीय धनगर समाज आरक्षण कृती समिती व सर्व धनगर समाजबांधवांना उपोषण सुरू करून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे.