पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सोडविला नाही, तर रामभक्तांचा संताप ज्वालामुखीसारखा उसळून बाहेर येईल, या शब्दांत भाजपचे राज्यसभेतील खासदार विनय कटियार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. एवढेच नाही तर राम मंदिराचा विषय हा देशाच्या आर्थिक विकासाच्या मुद्द्या इतकाच महत्त्वाचा असल्याचे कटियार यांनी म्हटले आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, राम मंदिराचा विषय कायमचा सोडवून टाकण्यासाठी केंद्र सरकारने संसदेमध्ये विधेयक मांडले पाहिजे. यापुढेही या विषयाकडे दुर्लक्ष केले गेले, तर रामभक्तांचा संताप ज्वालामुखीसारखा उसळून बाहेर येईल. हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यावर निर्णय यायला वेळ लागू शकतो. मात्र, सध्या भाजपकडे लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे केंद्र सरकारने यासंबंधीचे विधेयक मंजूर करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
राम मंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी संसदेमध्ये भाजपला ३७० सदस्यांची गरज आहे. तेवढे सदस्य नसल्यामुळे या विषयावर सध्या कोणताही निर्णय घेता येणार नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यांच्या याच मुद्द्याचा संदर्भ पकडून कटियार यांनी रामभक्तांचा अंत न पाहण्याचा सल्ला दिला आहे.