जिल्ह्यात या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी १७.८९ टक्के पावसाची नोंद झाली. ७० टक्के पेरण्या झाल्या. मात्र, पावसाने ताण दिल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीची बठक घेत कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना चारा पिकाच्या बियाणांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाणीयोजनेची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात चालू वर्षी १ जून ते १६ ऑगस्ट दरम्यान ७९२.७३ मिमी पाऊस पडला. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत ४३०६.३८ मिमी पाऊस पडला होता. या वर्षी पडलेल्या पावसाची एकूण सरासरी १७.८९ असून गतवर्षी ती ९७.७९ होती. गेल्या ८-१० दिवसांपासून भिज पावसानेही पाय काढता घेतल्याने पिके सुकून जाऊ लागली आहेत. परतीचा पाऊस आला, तरच काही प्रमाणात पिके हाती येतील. मात्र, जनावरांच्या चाऱ्यासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आता गंभीर होण्याची शक्यता आहे.
ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याने ऑगस्टनंतर जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने गतिमान वैरण विकास कार्यक्रमांतर्गत साडेसात हजार हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध केलेल्या बियाणांची माहिती द्यावी व तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार कराव्यात. शेतकऱ्यांची संभाव्य यादी तयार ठेवावी. शेतकऱ्यांकडील जनावरांची संख्या, पाण्याची उपलब्धता या बाबत सविस्तर माहिती तयार करण्याच्या सूचना गगराणी यांनी दिल्या.
जिल्ह्यासाठी सुमारे २५ लाख मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. उपलब्ध चारा ७ लाख मेट्रिक टन आहे. ७० हजार मेट्रिक टन चारा येत्या दोन महिन्यांत उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन विभागाचे डॉ. टाकळीकर यांनी दिली. पाणीपुरवठा विभागातर्फे दिलेल्या माहितीप्रमाणे एकूण ८० नळ योजनांपकी केवळ २०ची कामे पूर्ण झाली, तर इतर कामे अपूर्ण आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांपकी कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी २६ गावे नळयोजनेतील केवळ ८ गावांना नाममात्र पाणी मिळते. या चार योजनांतर्गत सुमारे ७६ गावांचा समावेश असून उर्वरीत गावे अजून पिण्याच्या पाण्यापासून दूर आहेत. सिद्धेश्वर, पुरजळ योजना वीजदेयक थकल्याने जवळपास बंदच आहेत. जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६५ विहिरींचे अधिग्रहण करून काही गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याची माहिती कार्यकारी अभियंता यंबडवार यांनी दिली. कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, पशुसंवर्धन अधिकारी टाकळीकर, कार्यकारी अभियंता यंबडवार, तहसीलदार विद्याचरण कडवकर आदींची उपस्थिती होती.