शेजारच्या छत्तीसगडमध्ये सलवा जुडूमचा लढा उभा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आदिवासी नेते चिन्नाराम गोटा यांची आज नक्षलवाद्यांनी हत्या केली. यावेळी झालेल्या चकमकीत गोटा यांचा सुरक्षा रक्षक मंगल तोडसाम सुध्दा ठार झाला. या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी गोटा यांच्या मुलाचे अपहरण केले आहे.
 २००५ मध्ये बस्तर विभागातील बिजापूर जिल्हय़ात सलवा जुडूमच्या लढय़ाला सुरूवात झाली. या मोहिमेची उभारणी करण्यात के. मधुकरराव यांच्या सोबत याच जिल्हय़ातील फरसेगुडाचे चिन्नाराम गोटा यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. तेव्हापासून नक्षलवाद्यांच्या रडारवर आलेल्या गोटा यांना छत्तीसगड सरकारने पोलिस संरक्षण दिले होते.
गोटा आज सकाळी शेतात काम करत असतांना सुमारे २०० नक्षलवाद्यांनी त्यांना घेरले. पाच सुरक्षा जवान व गोटा यांनी सुमारे एक तास नक्षलवाद्यांचा प्रतिकार केला. मात्र त्यांचा टिकाव लागला नाही. नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली. या घटनेत बुधाराम नावाचा आणखी एक सुरक्षा जवान गंभीर जखमी झाला आहे. नक्षलवाद्यांनी यावेळी घटनास्थळी असलेले गोटा यांचे चिरंजीव महेशचे अपहरण केले. या घटनेची माहिती मिळताच कुटरू पोलीस ठाण्यातील अतिरिक्त कुमक तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली. नक्षलवाद्यांनी सलवा जुडूममध्ये सक्रियता दाखवणाऱ्या ४१ नेत्यांना आतापर्यंत ठार केले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सलवा जुडूमची शांती यात्रा गडचिरोली जिल्हय़ातील भामरागड तालुक्यात आली होती.