युती अभेद्य राखण्यासाठी आम्ही १८ जागांचा त्याग केला, पण त्यांनी आमचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा झेंडा राज्यभर फडकेल तेव्हा या लोकांना भांडी घासायला लावू, असा हल्ला शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी येथे भाजपवर चढवला.  राऊत यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, युती आणि आघाडी तुटल्यामुळे जो तो पक्ष निवडणुकीत आपला रंग फासण्याचा प्रयत्न करीत आहे. पण महाराष्ट्राचे नशीब चांगले आहे की, स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यामुळे राज्यात शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यामुळे युती कोणी तोडली, कोणावर खापर फोडले या लहानसहान गोष्टीत आम्ही पडणार नाही. मात्र ज्या पद्धतीने वक्तव्ये होत आहेत त्यामुळे शिवसैनिक दुखावला गेला आहे. त्यामुळे आता आम्हाला भाजपची गरज नाही. यापुढे राज्य दिल्लीतून नाही तर मुंबईतून चालेल, अशीही टिप्पणी राऊत यांनी केली.