महाराष्ट्राच्या राजकारणात शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांचे नाते विळ्या-भोपळ्याच्या सख्यासारखे राहिले; पण शंकररावांच्या कर्मभूमीतील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डी. लिट. स्वीकारण्यासाठी रविवारी सकाळी शहरात येत असलेल्या पवारांनी शंकरराव चव्हाण स्मृतिसंग्रहालयाला भेट देण्याचे मान्य केले आहे. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात हे स्मृतिसंग्रहालय असून गतवर्षी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. शंकररावांचे पुत्र खासदार अशोक चव्हाण हे उपर्युक्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पवारांनी जुन्या नेत्याच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याचे निश्चित केले. या प्रसंगी मोजक्याच नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यात माजी खासदार भास्करराव खतगावकर यांचा मात्र समावेश नाही. जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांत नांदेडमध्ये काँग्रेसने आपले अव्वल स्थान कायम राखले; पण या पक्षाला बहुमताचा आकडा (३२) गाठता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला स्वतंत्रपणे लढून २१ जागांपर्यंत गेलेल्या भाजप व शिवसेनेने ‘राष्ट्रवादी’ सोबत सत्तेची मोट बांधता येते काय, याची धडपड सुरू केलेली असताना शरद पवार यांची खासदार चव्हाण यांच्या संस्थेला भेट आणि तेथेच त्यांची न्याहारी होणार असल्याने नांदेड जि. प. मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पर्वाची हॅट्ट्रिक होण्याची शक्यता बळावली आहे. सन २०१२ च्या जि. प. निवडणुकीत काँग्रेसला २५ जागांवर समाधान मानावे लागले होते. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ १८ जागांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काही हालचाली झाल्या; पण शेवटी काँग्रेसने ‘राष्ट्रवादी’च्या दोन गटांना सोबत घेत सत्ता सांभाळली. त्याआधीही जि. प. त आघाडीचीच सत्ता होती. महाराष्ट्रातील काही जिल्हा परिषदात ‘राष्ट्रवादी’ला काँग्रेसच्या मदतीची गरज असल्याने उभय पक्षांच्या दिल्लीस्थित नेत्यांनी प्राथमिक चर्चा करून आघाडीचे सूर जुळविले असल्याने नांदेडमध्ये अध्यक्षपदासाठी काँग्रेसला पािठबा दर्शवून उपाध्यक्षपद घेणे ‘राष्ट्रवादी’ ला क्रमप्राप्त असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस पक्षातून भाजपत गेलेले माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी पुणेस्थित आपली स्नुषा डॉ. मीनल पाटील यांना जि.प. च्या आखाडय़ात उतरवून घरच्या मदानावर (रामतीर्थ गट) निवडून आणले. सूनबाईंना जि. प. अध्यक्षपदी विराजमान करण्याचा सासरेबुवांचा ध्यास होता; पण ‘राष्ट्रवादी’चा निर्णय या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्या हाती राहिला नसल्याने खतगावकर, आमदार चिखलीकर, राम पाटील रातोळीकर या चव्हाणविरोधी नेत्यांच्या नव्या प्रतिनिधींना जि. प. मध्ये विरोधी बाकावर बसण्याचा प्रसंग आला आहे. पवारांचा मुक्काम खासदार शरद पवार तसेच राज्यपाल सी. विद्यासागरराव रविवारी सकाळी येथे येणार आहेत. विद्यापीठातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज्यपाल मुंबईला प्रयाण करणार असून पवार मात्र येथे मुक्कामी थांबणार आहेत. त्यांच्या सार्वजनिक जीवन कार्याच्या अर्धशतकाचे औचित्य साधत, येथील महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेने रविवारी सायंकाळी एक स्वतंत्र कार्यक्रम आयोजिला असून सर्वपक्षीय नेते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात पवारांच्या कार्याचा गौरव केला जाणार असल्याचे संयोजक कमलकिशोर कदम यांनी येथे सांगितले.