टाळय़ांच्या कडकडाटात पवार यांना डी.लिट. प्रदान स्वामी रामानंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्तिलढय़ातील कृतिशील नेतृत्व, त्यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान तसेच मराठवाडय़ात शैक्षणिक संस्कृती रुजवण्यासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्याची अत्यंत कृतज्ञ नोंद घेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी ‘स्वाराती’ मराठवाडा विद्यापीठाच्या डी.लिट. या मानद पदवीचा रविवारी स्वीकार केला.शिक्षणातून विद्यार्थ्यांना कसं घडवावं, त्यांना राष्ट्रहितासाठी प्रेरित करून इतिहास कसा घडवावा, याचा आदर्श स्वामी रामानंद तीर्थ यांनी घालून दिल्याचे गौरवोद्गार पवार यांनी पदवी स्वीकारताना काढले. विद्यापीठ परिसरातील दीक्षान्त मंचावर पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी भूषवले. त्यांच्या हस्ते पवार यांना पदवी प्रदान होताना अवघे सभागृह उठून उभे राहिले. टाळय़ांचा कडकडाट झाला. या वेळी मंचावर पालकमंत्री अर्जुन खोतकर, कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र. कुलगुरू डॉ. गणेश िशदे आदी हजर होते. डी.लिट. प्रदान करण्यापूर्वी पवार यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. केशव स. देशमुख यांनी केले. त्यातील अनेक भावस्पर्शी वाक्यांना उपस्थितांनी दाद दिली. गेल्या २६ फेब्रुवारी रोजी पवार यांना डी.लिट. देण्याची घोषणा कुलगुरूंनी केली होती. त्या घोषणेच्या वर्षपूर्तिदिनी डी.लिट. प्रदान करण्याचा सोहळा पार पडला. मराठवाडय़ातील परभणीच्या कृषी विद्यापीठाने यापूर्वी मला मानद पदवी दिली होती. त्यानंतर आज इथे, असे सांगतानाच स्वामी रामानंद तीर्थ यांनी पुण्याच्या ज्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली, त्या विद्यापीठानेही मला डी.लिट. दिल्याची आठवण पवारांनी सांगितली. स्वामीजींच्या नावाने नांदेडला विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय मुख्यमंत्रिपदी असताना घेता आला, याबद्दलचा आनंद त्यांनी व्यक्त केला. शिक्षणातून विद्यार्थ्यांना कसं घडवावं, त्यांना राष्ट्रहितासाठी प्रेरित करून इतिहास कसा घडवावा, याचा आदर्श स्वामी रामानंद तीर्थ यांनी घालून दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या समारंभातील आपल्या आटोपशीर दीक्षान्त भाषणात खासदार पवार यांनी गेल्या २०-२२ वर्षांत विद्यापीठाने केलेल्या प्रगतीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पहिले कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, विद्यमान कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, की ‘ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्यांच्या घरात शिक्षण वाढलं, त्या घरातले काही जण अन्य व्यवसायात गेले. अशा कुटुंबात सुबत्ता आली. मराठवाडा हा प्रदेश शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा प्रदेश आहे. त्यामुळे इथल्या तरुणांनी शिक्षणाविषयी आग्रही राहायला हवे. शिक्षणच त्यांना तारू शकणार आहे.’ खासदार पवार यांच्या भाषणाआधी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील महत्त्वपूर्ण कार्याचा आढावा सादर करतानाच भविष्यातील योजनांची माहिती दिली. शिक्षण, संशोधन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत हे विद्यापीठ पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी समारंभाचे अध्यक्ष कुलपती डॉ. सी. विद्यासागर राव यांनी वेगवेगळय़ा विद्याशाखांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना स्नातक म्हणून जाहीर केले. काही गुणवंत विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. विठ्ठल व प्रा. डॉ. माधुरी देशपांडे यांनी केले. विविध पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा परीक्षा नियंत्रक डॉ. रवि सरोदे यांनी केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पवारांकडून भरीव देणगी आपल्या भाषणाचा समारोप करताना खासदार शरद पवार यांनी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यापीठाला ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी १० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. या १० पकी ६ जण मराठवाडय़ातील निवडावेत. त्यात २ मुलींचा समावेश करावा, असे सांगून या शिष्यवृत्तीला अनुक्रमे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, श्यामरावजी कदम व शारदाबाई पवार यांची नावे देण्याची सूचना त्यांनी मांडली. शरद पवारांचे नाव कुठेही नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.