वैभव नाईक  यांचे प्रतिपादन

नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला तर त्याचा फायदा शिवसेनेला होईल असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक म्हणाले. रेडी पोर्टचा खटला न्यायालयात सुरू आहे, तो खटला मागे घेण्यासाठी सरकारने वकिलांना कळविले आहे. हे नारायण राणे यांच्यासाठीच सरकार करत असल्याचा आरोप देखील आ. नाईक यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी प्रकाश परब, रुपेश राऊळ, अशोक दळवी, विक्रांत सावंत, नारायण राणे, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.

नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश मागील ७ ते ८ महिन्यांपासून निश्चित झाला आहे. त्यामुळे कालची घोषणा नवीन नाही. मुलांचे राजकीय भवितव्य आणि उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालवावेत म्हणून राणे सत्ताधारी भाजपात जात आहेत. त्यांना सिंधुदुर्गातील कार्यकर्ते व विकासाचे देणे घेणे नाही असे आ. नाईक म्हणाले. रेडी पोर्ट जॉन अनॅस कंपनीला दिले होते. त्या कंपनीचा दोनशे कोटीचा फायदा झाला पण पोर्ट विकसित झाले नाही म्हणून मी आवाज उठविला. सरकारने रेडी पोर्ट ताब्यात घेतले. त्याविरोधात कंपनी मुंबई उच्च न्यायालयात गेली, आता हाच खटला सरकारने परत मागे घेण्याचे सरकारी वकिलांना पत्र दिले आहे. म्हणजेच नारायण राणे यांचा प्रवेश झाल्यावर तसे करण्यात येईल. राणेंचा प्रवेश निश्चित झाल्याचे आ. नाईक म्हणाले.

शिवसेना रिकामी करण्याचे राणे यांच्या आवाक्यात नाही. काँग्रेसमध्ये १२ वर्षे राहून काँग्रेसला धक्का दिला तेच भाजपात प्रवेश केल्यावर चित्र दिसेल.  शिवसेनेतून त्यांच्या सोबत गेलेले आमदार आता माजी आमदार झाले आहेत. त्यांच्या सोबत आता कोणीच नाहीत त्यामुळे ते सर्व इतिहासजमा झाले आहेत.  राणेंच्या कंपनीतील सिंधुदुर्गातील सदस्यच त्यांच्या सोबत जातील असे आ. नाईक म्हणाले.

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व मी ठेकेदारांकडे हप्ते मागत असल्याचे राणे अ‍ॅफिडेव्हिट करणार आहेत. अ‍ॅफिडेव्हिट कशाला कोणी साधी तक्रार केली तरी आम्ही राहणार नाही पण राणे यांच्या पुत्राने हप्ते मागितले म्हणून गुन्हा दाखल आहे.

त्याच्यावर काय करणार असे आ. नाईक यांना विचारले तसेच माजी खासदार नीलेश राणे यांच्या आणखी दोन जरी मुलाखती कालच्या सारख्या झाल्या तर त्यांचे डिपॉझिट देखील राहणार नाही असे आ. नाईक म्हणाले. माझ्या विधानसभेतील कामाची दखल राणे यांनी घेतली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो ते विधान परिषदेतील आमदार आहेत. त्यामुळे माझ्या सभागृहातील कामकाजाची टीका करता येणार नाही. असे आमदार वैभव नाईक म्हणाले.