लातूर, चंद्रपूर महापालिकेतील विजयावरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची जागा भाजप घेत असून काँग्रेस हा पक्ष कामात झीरो आणि मतपेटीत हिरो होता असे सांगत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. जनता अशी वाहवत का चालली आहे याचा शोध घ्यायला हवा असेही शिवसेनेने म्हटले आहे. लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिकेतील निकालांवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने एवढ्या वर्षात जो नाकर्तेपणा दाखवला त्यामुळेच आता भाजपला यश मिळू लागले. सरकार आणि संघ कार्यकर्त्यांची फौज असल्याने पक्षाला हे यश मिळणारच असेही सेनेने म्हटले आहे. सध्या भाजपच्या यशाचा मौसम आहे. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस जादूचे प्रयोग करत आहे. जनतेला या प्रयोगात मन रमवायचे असल्याने ते भाजपला मतदान करत असून यामुळे गांभीर्याने काम करणाऱ्यांचाही पराभव होत राहणार असे अग्रलेखात म्हटले आहे. लातूरमधील काँग्रेसच्या पराभवावरही शिवसेनेने भाष्य केले आहे. लातूर हा काँग्रेसचा गड होता. लातूरमध्ये भाजप झीरोवरुन हिरो झाला असून संभाजी निलंगेकरांसारखे तरुण नेतृत्व जिल्ह्याला मिळाले असे सेनेने आर्वजून नमूद केले. लातूरमधील जनता काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली होती, म्हणूनच त्यांनी भाजपला साथ दिली असून या विजयाचे खापर ईव्हीएमवर फोडणार नाही असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे. जनता अशी वाहवत का चालली आहे आणि मराठवाड्यातील शेतकरी तसेच तरुण वर्ग गारुड्यांच्या पुंगीमागे का चालला आहे याचा शोध घ्यावा लागेल असे शिवसेनेने म्हटले आहे. परभणीत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली. ६५ च्या सभागृहात काँग्रेसने मुसंडी मारली हे मान्य करावे लागेल. पण त्यांनी असे कोणते दिवे लावले की जनतेने त्यांना साथ दिली असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.