भाजप आणि शिवसेनेचा वाद काँग्रेसच्या पथ्थ्यावर पालकमंत्रिपद काढून घेतल्याचा राग ठेवून शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला धडा शिकवायचाच हा निर्धार केला होता. पण एक वेळ काँग्रेस परवडला, पण शिवसेनेला सत्तेत बसू द्यायचे नाही, अशी टोकाची भूमिका भाजपने घेतली. त्यातून भाजप आणि काँग्रेस ही विचित्र आघाडी जिल्ह्य़ात उदयाला आली आणि १२ सदस्य निवडून आलेल्या काँग्रेसला आयतेच अध्यक्षपद मिळून गेले. शिवसेना आणि भाजपच्या वादात काँग्रेस म्हणजे तिसऱ्याचा फायदा झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत सत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेने युती करण्याची दिलेली ‘ऑफर’ भाजपने का नाकारली व शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी असंगांशी संग करत तत्त्वांना तिलांजली का दिली? याचीच पडद्यामागील चर्चा आता सुरू आहे. निवडणूक काळात भाजप हा आपला शत्रू क्रमांक एक असून त्याला आडवा करण्याची भाषा शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सतत केली होती. त्याचेच पडसाद या निवडणुकीत बघायला मिळाले. आपले पालकमंत्रिपद काढून ते भाजपच्या मदन येरावार यांना दिल्याचा राग संजय राठोड प्रत्येक सभेत व्यक्त करत होते कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान करत पालकमंत्रिपद काढल्याच्या घटनेचाही त्यांना फायदाच झाला. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसले तरी ६१ सदस्यी जिल्हा परिषदेत २० जागा मिळवून सेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भाजप १८ काँग्रेस ११, राष्ट्रवादी काँग्रेस ११ आणि अपक्ष एक असे संख्याबळ असलेल्या जि.प.मध्ये सेना व भाजपची युती झाल्यास निभ्रेळ सत्ता स्थापन होऊ शकते हा विचार संजय राठोड यांनी मदन येरावार सांगितला तेव्हा भाजपला अध्यक्षपद , बांधकामसह दोन सभापतिपदे द्या असा प्रस्ताव सेनेसमोर ठेवला जो की, स्वीकारणे अशक्य कोटीतील गोष्ट होती. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी संजय राठोड यांनी राष्ट्रवादीपुढे मदतीचा हात पुढे ठेवला. राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मनोहर नाईक यांच्या पुसद येथील निवासस्थानी जाऊन चर्चा केली. मनोहर नाईकांना भाजप सत्तेत नकोच होती. कारण पुतणे नीलय नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी जमले आणि तशी घोषणाही करण्यात आली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बजोरिया संतापले. मनोहर नाईकांनी आपल्याला विश्वासात न घेता परस्पर संजय राठोड यांच्याशी आघाडी केल्याबद्दल कमालीचा संताप व्यक्त केला. बजोरियांनी मग चक्र फिरविली. काँग्रेसचे अकरा, भाजपचे १८, राष्ट्रवादीचा एक आणि अपक्ष एक अशी ३१ च्या बहुमताची मोट बांधत सत्तेचा मार्ग मोकळा केला. विधानपरिषद निवडणुकीच्या घोडा बाजारात आश्वासन न पाळलेल्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी संदीप बाजोरियांनी केली. सेना आणि भाजप यांच्या भांडणात तसेच राष्ट्रवादीतील नाईक विरुद्ध बाजोरिया या कलहात आपल्याला काँग्रेसने हात धुवून घेतले. काँग्रेसच्या माधुरी अनिल आडे अध्यक्षपदी आणि भाजपचे श्याम जयस्वाल उपाध्यक्षपदी प्रत्येकी ४१ मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेसोबत आघाडी करून सत्ता मिळत नाही हे लक्षात येताच मनोहर नाईकांनी घुमजाव करत संदीप बाजोरिया यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि काँग्रेस १२, राष्ट्रवादी काँग्रेस ११, भाजप १८, अपक्ष एक असे ४१चे संख्याबळ झाले. राठोडांना धक्का विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले. त्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेच्या विजयाची घोडदौड कायम राहिली.जिल्ह्य़ाचे खासदारपद शिवसेनेकडे असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्याचा राठोड यांचा प्रयत्न होता. पण भाजपचे राज्यमंत्री मदन येरावार, राष्ट्रवादीचे संदीप बजोरिया, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, वसंत पुरके आदी साऱ्या नेत्यांनी एकत्र येत राठोड यांना राजकीय धक्का दिला आहे.