छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना कधीच जाती-धर्मभेद केला नाही. मात्र सध्या राज्यकर्ते स्वार्थासाठी जाती-धर्मात भेदभाव करून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आपण जाती-धर्मीय सलोखा राखण्यासाठी दंगामुक्त महाराष्ट्रासाठी राज्यभर फिरून जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे अध्यक्ष सुभान अली शेख यांनी किल्ले रायगडावर केले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडतर्फे आज किल्ले रायगडावर शाक्त शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी सुभान अली बोलत होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून किमान ५० हजार मुस्लीम शिवभक्त उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र अतिरेकी घुसल्याचा कांगावा करीत रायगडसह सर्वत्र हाय अलर्ट केल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसल्याचे सुभान अली यांनी सांगून, हे अतिरेकी आत्ताच कसे घुसले, याबाबत साशंकता व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्य प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपण सर्वानीच प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. शेकापचे आमदार जयंत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पुण्यतिथी महात्मा जोतिबा फुले यांनी साजरी केली. बहुजन समाजाला एकत्रित करण्याचे काम त्यांनी त्या वेळी केले. मात्र छत्रपतींचा इतिहास पुसण्याचे काम काही नतद्रष्ट मंडळी जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. दंगामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न करण्यासाठी सुभान अली शेख करीत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून त्यांच्या या कामात आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. रायगडावरील राजदरबार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जमात-ए-इस्लामिक हिंदचे प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लम, रिपब्लिकन नेते सुनील खांबे आदी उपस्थित होते. या वेळी मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या वेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने रायगड दुमदुमून गेला.