कोल्हापूर शहरात प्रवेश करताना टोल आकारण्यासाठी उभारण्यात आलेले तीन टोलनाके रविवारी रात्री शिवसैनिकांनी जाळले. कसबाबावडा, शाहूनाका आणि फुलेवाडी या तीन ठिकाणांचे टोलनाके शिवसैनिकांनी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास जाळले. या प्रकरणी राजारामपुरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
आयआरबी कंपनीकडे कोल्हापूरातील अंतर्गत रस्ते बांधणीचे २२० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीने बांधलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत, असे कोल्हापूरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी नागरिकांनी टोलविरोधी कृतीसमितीही स्थापन केली आहे. शिवसेनेचा या टोलवसुलीला विरोध आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी हे टोलनाके जाळल्याची माहिती आहे. रात्री सव्वा वाजते शिवसैनिक या तीनही टोलनाक्यांवर गेले आणि त्यांनी ते जाळले.
(संग्रहित छायाचित्र)