गेल्या चाळीस वर्षांपासून न चुकता आम्ही सिध्देश्वर यात्रेत व्यवसायासाठी येतो. परंतु नोटाबंदीमुळे यंदाच्या यात्रेत थंडावलेल्या व्यवसायाची स्थिती यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. केवळ ३० ते ४० टक्के व्यवसाय होत असल्याने नफा तर दूरच, पण खर्च तरी कसा भागवायचा, याची विवंचना लागली आहे. म्हैसूर येथून आलेले कलाकुसरीच्या पितळी वस्तूंचे व्यापारी फारूख शेख आपली व्यथा मांडत होते. नोटाबंदीचा जबर फटका बसल्याने जवळपास अशीच परिस्थिती सिध्देश्वर यात्रेतील व्यावसायिकांवर ओढवली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख यात्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेत आबालवृध्दांना आकर्षित करण्यासाठी अनेक करमणुकीची दालने उभारली जातात. करमणुकींच्या साधनांसह खेळणी, सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ, मिठाई, संसारोपयोगी वस्तू अशी एकापेक्षा एक दालने यात्रेत सर्वाना आकर्षित करीत असतात. सिध्देश्वर यात्रेशी सोलापूरकर नागरिकांचे भावनिक नाते आहे. लहानपणी आजोबांबरोबर यात्रेत फेरफटका मारत होतो. आता स्वत:च्या नातवांना घेऊन यात्रेत आनंद लुटण्याची संधी पिढय़ान् पिढय़ा जपली जाते. राव असो वा रंक, प्रत्येकाच्या सिध्देश्वर यात्रेविषयी सुखद आठवणी आहेत. स्थानिक भाषेत सिध्देश्वर यात्रेला गड्डा यात्रा म्हणून संबोधले जाते. गड्डा यात्रा आली आणि यात्रेत गेलो नाही, हा अपवादच समजायचा. यंदा सिध्देश्वर यात्रा भरली ती नोटाबंदीचे सावट घेऊन. नोटाबंदी तथा निश्चलनीकरणाचा अंमल सुरू झाल्यानंतर सर्वच बँकांसमोर खातेदार नागरिकांच्या लागणाऱ्या रांगा आता दोन महिन्यांनंतर संपुष्टात आल्या आहेत. त्याचा विचार करता नोटाबंदीचा तेवढासा फटका सिध्देश्वर यात्रेला बसणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात यात्रेतील आर्थिक उलाढाल प्रचंड मंदावल्याचे दिसून आले. यात्रेत ३५० पेक्षा जास्त दालने उभारली आहेत. नोटाबंदीचा फटका जवळपास सर्वच व्यावसायिकांना बसला आहे. यात्रेत सर्वाधिक आकर्षण ठरणाऱ्या ‘मौत का कुंवा’ला नोटाबंदीचा मोठा फटका बसला असून यात सुमारे तीन लाखांचा खर्च भरून कसा काढायचा, असा यक्षप्रश्न सतावतो आहे. ‘मौत का कुंवा’चे व्यवस्थापन सांभाळणारे खुर्शीद सांगत होते. ६४ टन वजनाचे ‘मौत का कुंवा’चे लोखंडी सांगाडे नांदेडहून सोलापुरात आणण्यासाठी आलेला वाहतूक खर्च, जागा भाडे, मौत का कुंवामध्ये जीव धोक्यात घालून दुचाकी व मोटारी चालविणाऱ्या आठ रायडर्ससह १५ कामगारांचा दररोजचा मेहनताना, इंधन, वीज, खाणे-पिणे इत्यादी बाबींवर सुमारे तीन लाखांपर्यंत खर्च होतो. ‘मौत का कुंवा’च्या एका खेळासाठी किमान दीडशे प्रेक्षकांचा प्रतिसाद अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३० ते ४० प्रेक्षकच येतात. ४० टक्केही धंदा होत नाही. त्याची चिंता खुर्शीद यांनी बोलून दाखवली. यात्रेत हा अनुभव पहिल्यांदाच प्रत्ययास आल्याचे ते सांगतात. बालगोपालांना भुरळ घालणारी रेल्वे बाबागाडी आणलेले लखन पाटील (रा. मालेगाव, जि. नाशिक) हे सिध्देश्वर यात्रेत गेल्या पंधरा वर्षांपासून व्यवसाय करतात. परंतु यंदा नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याचे गाऱ्हाणे ते मांडतात. गतवर्षीच्या यात्रेत दररोज १५ ते २५ हजारांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. परंतु यंदा त्यात प्रचंड घट होऊन दररोज पाच हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले नाही. आज तर अडीच हजारांपर्यंतच धंदा झाल्याचे ते सांगतात. खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ कसा घालायचा, याची चिंता असल्याचे लखन पाटील यांनी नमूद केले. हीच तऱ्हा ‘आनंदी नगरी’ व वैष्णवी देवी देखाव्याच्या चालकांची आहे. यात्रेत तिसऱ्या पिढीपासून उसाच्या रसाची विक्री करणारे अशोककुमार चव्हाण यांनी गतवर्षी यात्रेत २५ मे. टन उसाच्या रसाची विक्री केली होती. परंतु यंदा नोटाबंदीमुळे ग्राहकांची संख्या कमालीची घटली असून आतापर्यंत जेमतेम सहा मे. टन एवढय़ाच उसाच्या रसाची विक्री झाली. त्यामुळे नफा तर सोडून द्या, पण खर्च तरी कसा भागवायचा, याची भ्रांत असल्याचे चव्हाण सांगतात.