जिल्ह्यात सोमवारी दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये सहा जण ठार झाले. मनमाड-चांदवड रस्त्यावर मारुती कार व मालट्रक यांच्यातील अपघातात चारजण ठार झाले. तर दुसरा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर खडकजांब येथे झाला. त्यात महिला व मुलगी ठार झाल्या.
मनमाड-चांदवड रस्त्यावर हरनुल गावाजवळ सोमवारी दुपारी पहिला अपघात झाला. त्यात फकीरचंद आबड (४०), मुलगा चेतन आबड (१२), योगेश कैलास आबड व सूर्यभान शिंदे हे जागीच ठार झाले. आबड कुटुंबीय मारुती कारमधून चांदवडकडे निघाले होते. हरनुल गावाजवळ समोरून येणाऱ्या मालमोटारीचे चाक फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यात मालमोटारीखाली कार सापडली. त्यात कारमधील सर्वजण ठार झाले. दुसरा अपघात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. खडकजांब गावाजवळ रस्ता ओलांडताना भरधाव जाणाऱ्या कारने धडक दिल्याने महिला व मुलगी ठार झाल्याची माहिती वडाळी भोई आऊट पोष्टकडून देण्यात आली. त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत.