मंत्री, राजकीय नेत्यांचे नातलगांसाठी प्रयत्न
शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती गुपचुप करण्याचा डाव सरकार खेळत असले तरी माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी साईभक्तांना सजग केल्याने मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत. काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी शिफारशी केल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक राजकीय नेत्यांचे स्वत:ची, कुटुंबातील सदस्याची किंवा कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून धडपड सुरू आहे.
साईबाबा संस्थानवर वर्णी लावण्यासाठी यापुर्वीही काँग्रेस पक्षाच्या हायकमांडकडून नाव आणले जाण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मागील विश्वस्त मंडळात अशा प्रकारे काही विश्वस्त हायकमांडकडून आले होते. आताही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी जशा शिफारशी केल्या आहेत, त्याचप्रमाणे दिल्लीतील काँग्रेसचे प्रभावशाली नेते अहमद पटेल यांनीही काही नावाची शिफारस केली आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नांदेड येथील दिलीप कंदकुंदरे यांचे नावाची शिफारस केली आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कुटुंबातून तीन अर्ज सरकारकडे करण्यात आले आहेत.   िशदे यांनी पुण्यातील निकटवर्तीयाचे नाव सुचवले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी डॉ. नामदेव गुंजाळ यांचे नाव सुचविले आहे. शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व त्यांच्या पत्नी सरस्वती यांनीही अर्ज केले आहेत.