१८.८२ लाख टन ऊस गाळप सोलापूर जिल्ह्य़ात यंदा गाळप हंगामात उसाची टंचाई प्रचंड प्रमाणात जाणवत असल्यामुळे एकूण ३५ पैकी जेमतेम १९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. आतापर्यंत १८ लाख ८२ हजार मे. टनाएवढय़ा उसाचे गाळप झाले आहे. यात एकूण १६ लाख ९७ हजार ६२० क्विंटल साखर निर्माण झाली आहे. सर्वाधिक चार लाख मे. टन उसाचे गाळप माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने केले आहे. मागील सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती राहिल्यामुळे यंदाच्या गाळप हंगामासाठी केवळ ६५ हजार हेक्टर क्षेत्रापुरताच ऊस उपलब्ध झाला आहे. त्यापैकी किमान ३० ते ४० टक्के ऊस बेण्यांसाठी वापरला जात असल्याने प्रत्यक्षात साखर कारखान्यांना गाळपासाठी फारच थोडय़ा प्रमाणात ऊस मिळत आहे. त्यातच ऊस दराची स्पर्धा लागल्याने तसेच शेजारच्या कर्नाटकातून चढय़ा दराने ऊस आणला जात असल्यामुळे सशक्त साखर कारखानेच टिकाव धरत आहेत. उर्वरित कारखान्यांनी गाळप न करणेच पसंत केले आहे तर काही कारखान्यांनी गाळप सुरू करून नंतर काही दिवसातच पेटलेले धुराडे बंद ठेवण्यात शहाणपणा दाखविला आहे. गेल्या ५ नोव्हेंबरनंतर बहुसंख्य साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले असून आतापर्यंत १९ कारखाने टिकाव धरू शकले आहेत. यात ३३ दिवसांत सर्वाधिक चार लाख १६२५ मे. टन ऊस गाळप करून तीन लाख ८५ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्याचा मान माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने मिळविला आहे. या कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे. टन क्षमतेची असताना प्रत्यक्षात दररोज सरासरी ११ हजारापेक्षा जास्त क्षमतेने गाळप होत आहे. अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचीही दररोजची गाळप क्षमता ७५०० मे. टन आहे. या कारखान्याने गेल्या ३० दिवसात एक लाख ७२ हजार ६२२ मे.टन ऊस गाळप करून सरासरी ९.८७ टक्के उताऱ्याने एक लाख ६३ हजार ६०० क्विंटल साखर तयार केली आहे. सर्वाधिक १०.०९ टक्के साखर उतारा माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने मिळवत गेल्या ३३ दिवसात एक लाख ९६ हजार ४१५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. यात एक लाख ९२ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील लोकमंगल खासगी साखर कारखान्याने एक लाख ७८९५ मे. टन उसाचे गाळप करून ९८ हजार ३०० क्विंटल साखर तयार केली आहे. तर सोलापूरच्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने एक लाख ६१५० मे. टन तर मंगळवेढय़ाच्या युटोपियन खासगी साखर कारखान्याने एक लाख ६७७४ मे. टन ऊस गाळप केला आहे. मंगळवेढय़ाच्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्यानेही एक लाख ५०६० मे. टन ऊस गाळप करून स्पर्धेत मजल मारली आहे. याशिवाय अन्य साखर कारखान्यांनी केलेल्या गाळपाची स्थिती अशी : विठ्ठल सहकारी, गुरसाळे, पंढरपूर-९७ हजार ९५०, विठ्ठृल शुगर, म्हैसगाव, ता. माढा-९२ हजार ७०१, सासवड शुगर, माळीनगर-७८ हजार ४३०, जकराया, वटवटे, ता. मोहोळ-६५ हजार ९१०, फॅबटेक, मंगळवेढा-६२ हजार ४७५, मकाई सहकारी, करमाळा-५९ हजार ७८५, भैरवनाथ शुगर, विहाळ-५५ हजार ५६०. चालू असलेल्यापैकी काही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम रडतरखडत सुरू असून यात लोकमंगल, बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर-४८ हजार ९८५, चंद्रभागा सहकारी, भाळवणी-३९ हजार १०८, भैरवनाथ, लवंगी-३६ हजार ७१५, जयहिंद शुगर, आचेगाव, दक्षिण सोलापूर-३० हजार व गोकुळ, धोत्री, ता. दक्षिण सोलापूर-१७ हजार ७५२ यांचा समावेश आहे. तर संत कूर्मदास (माढा), सिध्दनाथ (तिऱ्हे, उत्तर सोलापूर), विजयरत्न (करकंब, पंढरपूर), लोकनेते (अनगर, मोहोळ), भीमा सहकारी (टाकळी सिकंदर, मोहोळ), स्वामी समर्थ (अक्कलकोट), मातोश्री (दुधनी, अक्कलकोट, आदिनाथ सहकारी (करमाळा), चांदापुरी (माळशिरस) आदी मिळून १६ साखर कारखाने बंद आहेत.