वीरशैवांचा मोर्चा, तावडेंच्या अंगावर भंडारा उधळला

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. या विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी शिवा महाराष्ट्र वीरशैव युवक संघटनेच्या पुढाकाराने सिद्धेश्वरभक्तांनी विशाल मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन घडविले, तर दुसरीकडे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव या विद्यापीठाला देण्याच्या आग्रहापोटी धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर भंडारा आणि पत्रके उधळली. विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नावर चिघळत चाललेले सोलापुरातील वातावरण शिक्षणमंत्र्यांनाच प्रत्यक्ष अनुभवास आले आहे.

सोमवारी दुपारी कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून शिवा संघटनेच्या पुढाकाराने निघालेल्या वीरशैव लिंगायत समाज तथा सिद्धेश्वरभक्तांच्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद लाभला. सुमारे ५० हजारांचा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला होता. या मोर्चासाठी सोलापूर शहर व जिल्ह्य़ासह शेजारच्या उस्मानाबाद व लातूरसह कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बीदर आदी भागांतून सिद्धेश्वरभक्त एकत्र आले होते. यात तरुणांचा व महाविद्यालयीन तथा शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेप्रमाणे पारंपरिक बाराबंदीचा पांढराशुभ्र पोशाख घातलेल्या कार्यकर्त्यांचा सहभागही तेवढाच लक्षवेधी होता.

हा मोर्चा मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील होम मैदानावर पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. या वेळी ग्रामदैवत सिद्धेश्वर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देणे किती न्यायाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न बऱ्याच वक्त्यांनी केला. मात्र या प्रश्नावर समाजातील एकोपा व सलोखा धोक्यात येऊ न देता कायम टिकवण्यासाठी परस्परसमन्वयाची भूमिका घेण्यात येत असल्याचे सांगत हा मोर्चा धनगर समाजाच्या विरोधात नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. मोर्चेक ऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले.

एकीकडे वीरशैव लिंगायत समाजासह एकूणच सिद्धेश्वरभक्तांचा विशाल मोर्चा निघाला असताना दुसरीकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृतिमंदिरात शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता. त्या वेळी अचानकपणे धनगर समाजाचे काही कार्यकर्ते ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशा घोषणा देत अचानकपणे व्यासपीठावर चढले. या कार्यकर्त्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवी होळकरांचे नाव देण्याच्या मागणीचा आग्रह धरत शिक्षणमंत्री तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळत मागणीची पत्रके भिरकावली. नंतर तावडे यांनीही आपल्या भाषणात ‘जय मल्हार’ची घोषणा देत धनगर समाजाच्या संबंधित आंदोलक कार्यकर्त्यांना शांत करण्याचा व चुचकारण्याचा प्रयत्न केला. मात्र यानिमित्ताने सोलापुरात एकाच वेळी शिक्षणमंत्री तावडे यांना विद्यापीठ नामांतर प्रश्नावर सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा अनुभव पाहावयास मिळाला.

झाले काय?

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी धनगर समाजाने जोर लावला असताना दुसरीकडे ग्रामदैवत सिद्धेश्वराचेच नाव या विद्यापीठाला दिले जावे, या मागणीसाठी वीरशैव लिंगायत समाज एकवटला आहे. याशिवाय अन्य २६ संघटनांनी सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात यावे, यासाठी वेगवेगळ्या मागण्यांचे प्रस्ताव दिले आहेत. यापैकी धनगर समाज व वीरशैव लिंगायत हे दोन समाज एकमेकांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत परस्परविरोधी दावे करीत असल्याने येथील एकूणच सामाजिक वातावरण गढूळ बनले आहे.