काश्मीर चकमकीतील जवान गावडे यांचा मृत्यू
कुपवाडय़ातील एका अड्डय़ावर लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना यमसदनी धाडण्याचे शूर कृत्य करताना जबर जखमी झालेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान पांडुरंग गावडे (३२) यांना रविवारी वीरमरण प्राप्त झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आंबोली-मुळवंदवाडीतील रहिवासी होते. गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघ्या पाच महिन्यांचा आहे. आज, सोमवारी गावडे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे.
श्रीनगर कूपवाडा येथे कंपनी कमांडर म्हणून कार्यरत असलेले गावडे ‘क्विक रिअ‍ॅक्शन टीम’मध्ये कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून कुपवाडा येथे भारतीय सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान पांडुरंग गावडे यांच्यानजीकच झालेल्या हातबॉम्बच्या स्फोटात त्यांच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाली. जबर जखमी अवस्थेतच त्यांना प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच रविवारी पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली.
आई – वडिलांना धक्का
पांडुरंग यांचे वडील महादेव गावडे हे ७८ वर्षांचे आहेत तर आई महालक्ष्मी गावडे या ७० वर्षांच्या आहेत. त्यांना हे वृत्त समजल्यापासून त्यांचीही प्रकृती खालावली आहे. पांडुरंग यांचे दोन्ही मोठे भाऊही सैन्यातच सेवा बजावत आले आहेत, त्यापैकी गणपत महादेव गावडे हे पांडुरंगचे मोठे भाऊ निवृत्त सैनिक असून, मधला भाऊ अशोक गावडे हे सध्या धुळे येथे एनसीसीमध्ये कार्यरत आहेत. पांडुरंग यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. पांडुरंग यांना प्रज्वल हा पाच वर्षांचा, वेदांत हा चार महिन्याचा मुलगा आहे. फेब्रुवारी महिन्यात पांडुरंग हे एक महिन्याच्या रजेवर आले होते. यात त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचा वाढदिवस तर धाकटय़ा मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला होता. मुळवंदवाडी परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पालकमंत्री दीपक केसरकर, तहसीलदार, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गावडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात आंबोलीत अन्त्यसंस्कार होतील, असे सांगण्यात आले. आंबोलीतील सैनिकी इतिहासात दहशतवाद्यांशी लढताना जवान शहीद होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तेथीलच काही माजी सैनिकांनी सांगितले.
पांडुरंग हे २००१ मध्ये बेळगाव येथे मराठा लाइन इन्फन्ट्रीमधून भारतीय सैन्यात भरती झाले होते.
ते उत्तम फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटू होते, तसेच त्यांना रेडिओ ऑपरेटर युनिटचे पारितोषिकही मिळाले होते. गेली दोन वर्षे ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते.