कुटुंबाच्या कर्जाला कंटाळून तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील तरुण शेतकरी सिद्धाप्पा ज्ञानदेव चेंडके यांनी शुक्रवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धाप्पा याचा १५ मे रोजी विवाह झाला. मात्र, सुखी संसाराची सुरुवात होण्याआधीच हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी इटकळ पोलिसांत नोंद करण्यात आली. पोलीस पंचनाम्यानंतर सिद्धाप्पा (वय ३०) याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी बसस्थानकावर जाऊन येतो, असे सांगून दुचाकीवर बाहेर पडलेल्या सिद्धाप्पा याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. विवाहासाठी कुटुंबाने खासगी व बँकेचे सुमारे ३ लाख कर्ज काढले होते. विवाहानंतर वावरयात्रा पूर्ण होऊन पत्नी माहेरी गेली होती. विवाहात मोठा खर्च झाल्याचा दबाव घेऊन सिद्धाप्पा याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. घरातला कर्ता व निव्र्यसनी मुलगा हरपल्याने चेंडके परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, बहीण, असा परिवार आहे.