स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काळे झेंडे आघाडी सरकारच्या संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी मोठा गाजावाजा करत भाजपाने जाहीर केलेल्या शेतकरी शिवार संवाद यात्रेचा गुरूवारी नंदुरबारमध्ये फज्जा उडाला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या यात्रेत जिल्ह्य़ाअंतर्गत भाजपामधली दुफळी समोर आली. यात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दानवेंना काळे झेंडे दाखविले. आपल्या पक्षाच्या नगराध्यक्षाच्या शेतातील निवासस्थानी भाजपाने हा शेतकरी शिवार संवादाचा कार्यक्रम आटोपल्याने नक्की ही संवाद यात्रा कोणासाठी, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी शिवार संवाद यात्रेत कोणताही डामडौल न दाखविता भाजपा नेते आणि मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून शासनाच्या योजनांची माहिती देतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. या यात्रेची सुरूवात प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी नंदुरबारहून केली. यात्रेचा पहिल्याच कार्यक्रमात फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. बुधवारी रात्रीपासून जिल्हा मुक्कामी असणारे दानवे यांना शेतकऱ्यांविषयी काढलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधाला सामोरे जावे लागले. या दौऱ्याला सेनेसह अन्य संघटनांनी आधीच विरोध केला असल्याने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. असे असतांनाही दानवेंचा ताफा नांदरखेडा गावाकडे जात असतांना डामरखेडा गावातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दानवेंना काळे झेंडे दाखविले. दानवेंचा ताफा नांदरखेडय़ात गेल्यावर गावातील शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन त्यांच्या सोबत संवाद साधण्याऐवजी दानवेंनी आपल्याच पक्षाचे शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या शेतातील घरीच आपला कार्यक्रम आटोपता घेतला. त्याच ठिकाणी परिसरातील ३०-४० शेतकऱ्यांना बोलावून भाजपाने दौऱ्याची औपचारिकता पार पाडली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढा दानवेंसमोर वाचावयास सुरूवात करताच आपल्या शासनाच्या चांगल्या योजनांबद्दल काही तरी बोला, नाही तर आम्हाला धडकीच भरते, असे दानवेंनी सांगितल्याने सर्वच अवाक झाले. दौऱ्यात दानवे आणि पालकमत्री जयकुमार रावल यांनी आश्वासनापलीकडे शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. ब्राम्हणपुरी गावात देखील सुमारे ६० शेतकऱ्यांसोबत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत दानवेंनी एका खतं विक्रेत्याच्या गोदामाच्या प्रांगणात शेतकऱ्याशी चर्चा केली. दानवेंसह भाजपा पदाधिकाऱ्यांची जीभ पुन्हा घसरली नांदरखेडा येथील शेतकरी संवाद कार्यक्रमातील भाषणादरम्यान दानवे यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी वादग्रस्त ‘साला’ शब्दाचा पुन्हा वापर केला. परंतु, मागील अनुभवावरून त्यांनी तो यावेळी शेतकऱ्यांसाठी न वापरता स्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी वापरला. नंदुरबारमधील विस्तारक अभियानाच्या सभेत प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे यांनी दानवेंच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन करण्यासाठी अक्षरश: एका शिवीचा उल्लेख केला. महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचे भानही न ठेवता ही शिवी आपल्या बोली भाषेत प्रचलीत असल्याचे सांगत त्यांनी उलट दानवेंवर टीका करणाऱ्या प्रसार माध्यमांनाच दोषी ठरविण्याचे काम केले