नगर-जामखेड रस्त्यावर सारोळा बद्दी (ता. नगर) येथे तवेरा गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात ४ जण ठार, तर १० जण जखमी झाले. रविवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. मृत व जखमी प्रवासी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील असून ते वसईहून उस्मानाबादकडे निघाले होते.
चालकाच्या डोळ्यावर झोप असल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व चार-पाच पलटय़ा होऊन गाडी रस्त्यावरून २५-३० फूट पुढे फरफटत गेली. आतील प्रवासीही झोपेत असल्याने त्यांना सावरता आले नाही. बरेचजण गाडीच्या बाहेर फेकले गेले. त्यातच चौघांचा मृत्यू झाला. अर्चना पांडुरंग घरत (वय, ३५), वैष्णवी पांडुरंग घरत (वय, ५ दोघेही राहणार, लोणारवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), भागूबाई श्रीराम सपकाळे (वय, ३५, रा. कुंभळी, ता. भूम), मीराबाई उत्तम तागडे (वय, ३५ रा. निजामवाडी, ता. भूम) अशी मृतांची नावे आहेत.