चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळा डिजीटल महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या संपूर्ण शाळा डिजीटल करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्हा आहे. या निर्णयाने शैक्षणिक क्रांतीला सुरुवात झाली असून शिक्षकांनी स्वत:ला झोकून देऊन नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. जिल्हा परिषद शाळांना नावलौकिक प्राप्त करून द्यावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. येथील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित डिजिटल शाळा साहित्य वितरण सोहळय़ात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदन सिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा परिषदेचे सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रिजभुषण पाझारे, गोदावरी केंद्रे, अर्चना जीवतोडे, संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार व अंजली घोटेकर उपस्थित होते. शैक्षणिक मानांकनानुसार आवश्यक असणारे साहित्य आज आम्ही ५७१ शाळांना दिले आहे. यामध्ये संगणक संच, प्रोजेक्टर, स्क्रीन आणि ५ ते १२ वी पर्यंत आवश्यक असणारे डिजीटल अभ्यास साहित्य दिले आहे. चंद्रपूर जिल्हा येथेच थांबणार नसून अंबानी ट्रस्ट सोबत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबाबतचा आमचा करार झाला आहे. ४५ अंश सेल्सिअस तापमानात जिल्हय़ातील शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ चांदा क्लबवर हजारोंच्या संख्येत उपस्थित असन गरिबांची मुले जिथे शिकतात तिथे हा प्रयोग यशस्वी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रयोगाची दखल घ्यावी इतके गुणवत्तापूर्ण शिक्षण चंद्रपूरच्या जि.प.शाळेत झाले पाहिजे. यावेळी त्यांनी बल्लारपूर येथे सुरू केलेल्या मुलींच्या डिजीटल शाळांचा दाखल दिला. आगामी काळात मुलाची अॅडमिशन बल्लारपूर शहरातील डिजीटल शाळेत झाली पाहिजे अशी मागणी आपल्याकडे होईल, असे शुभचिंतन त्यांनी व्यक्त केले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या जिल्हय़ात नवीन काय केले आहे हे पाहण्यासाठी मी येथे आले आहे, असे ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. ते कोणतेही काम हाती घेतल्यानंतर त्याकडे विशेष लक्ष देवून ते काम पूर्ण करत असतात. तसेच जिल्हय़ात राबविण्यात येत असलेल्या उज्ज्वला गॅस योजना, डिजीटल शाळा यासारख्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमामध्ये ५७१ शाळांना संगणक संच, प्रोजक्टर, स्क्रीन हे साहित्य वाटप करण्यात आले. तर जिल्हय़ात हागणदारी मुक्त झालेल्या समित्या व ग्रामपंचायतींच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठीच्या व जि.प.लघु सिंचन विभागाच्या वेबसाईटचा शुभारंभ देखील करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेने तयार करण्यात आलेल विकासाच्या वाटा २०१६-१७ या पुस्तिकेचे विमोचनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हय़ातील शिक्षक तसेच मोठय़ा प्रमाणात नागरिक उपस्थित होते.