जातीच्या टक्केवारीनुसार उमेदवारीचे वाटप सर्वच राजकीय पक्षांद्वारे करण्याची बाब नवी नाही. मात्र, आता जातींनीच आपली निवड उमेदवारनिहाय नव्हे, तर पक्षनिहाय करीत विशिष्ट पक्षाला उचलून धरण्याचा प्रघात तेली समाजाच्या भाजपवरील प्रेमाने दिसून आला आहे. प्रामुख्याने पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांत तेली समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यानुसार सर्वच पक्षांकडून या समाजास निवडणुकीत प्राधान्य देण्यात येते, पण पूर्वीपासून कांॅग्रेसनिष्ठ राहिलेल्या तेली समाजाने गेल्या पाच वर्षांंपासून हे प्रेम संपुष्टात आणत भाजपचा पर्याय शोधल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव साठे यांनी या समाजातील नेत्यांना १९८० पासून राजकीय प्रवाहात आणून ताकद दिली. वर्धा जिल्ह्य़ात या प्रयोगाची सुरुवात झाली. प्रयोग यशस्वीही ठरला, पण १९९५ पासून समाजावर अन्याय होत असल्याची भावना हळूहळू पसरत गेली. २००९ च्या निवडणुकीत समाजावर कॉंग्रेसने अन्याय केल्याची उघड तक्रार झाली. शांताराम पोटदुखे, विनायक बांगडे, रमेश गिरडे, मधुकरराव किंमतकर, प्रमोद शेंडे, गोविंदराव वंजारी अशी व अन्य नेते मंडळी सत्तापटलावरून बाजूला पडत गेली. आता कॉंग्रेसला अद्दल घडवावी, असा संकल्पच समाजाने केल्याचे तीन वषार्ंपूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले. भाजपला समाजाने पसंती देत जिल्ह्य़ातील सहापैकी पाच पालिकांवर, तसेच जिल्हा परिषदेत कमळ फु लविले. भाजपचा उमेदवार कोणत्याही समाजाचा असू दे, पण मतदान कमळालाच करण्याची तेली समाजाची दिशा ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तेली पट्टय़ात उभे कुणबी-मराठा उमेदवारही निवडून येऊ लागले. त्याचीच दखल घेत लोकसभा निवडणुकीत समाजाचे नेते रामदास तडस यांना पक्षाने उमेदवारी दिली. प्रमुख पक्षांपैकी केवळ भाजपने दिलेला राज्यातील एकमेव तेली उमेदवार, असा पैलू समाजात चर्चिला गेला. एकगट्ठा मते भाजपकडे वळली. ताज्या विधानसभा निवडणुकीत समाजनेत्यांनी भाजप श्रेष्ठींकडे ११ जागांची मागणी केली. चार विदर्भात मिळाल्या. त्यापैकी चंद्रशेखर बावणकुळे, कृष्णा खोपडे व चरण वाघमारे हे निवडून आले. सुरेश वाघमारे गटबाजीतून पडले. प्रांतिक तैलिक समाज संघटनेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस म्हणाले, ‘समाजाला भाजपने न्याय दिल्याची बाब मान्यच करावी लागेल. कॉंग्रेसवर रोष होताच. पूर्व विदर्भात भाजपला यश मिळवून देण्यात समाजाचा वाटा मोठा आहे.’ भाजपवरील निष्ठा व्यक्त करतांनाच समाजाने मग स्वजातीच्या उमेदवाराचाही विचार न केल्याचे शेखर शेंडे, शेखर सावरबांधे, राजू तिमांडे, रविकांत बालपांडे यांच्या पराजयाने स्पष्ट झाले. कांॅग्रेस नेते दत्ता मेघे यांनी जि.प.अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या कोणत्याही गटाचा का असेना, पण तेली समाजाचा सदस्यच अध्यक्ष करण्याची भूमिका आग्रहाने मांडली. ती मान्यही झाली, पण तोवर समाजमन जिंकण्याची वेळ कांॅग्रेसच्या हातून निघून गेली होती. या अशा पक्षीय धृवीकरणाच्या यशस्वी प्रयोगामागे खासदार तडस यांची व्यूहरचना असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.