जिल्हय़ात गेल्या २४ तासांत सहा वेगवेगळय़ा घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन शेतकऱ्यांचा समावेश असून, नापिकीला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील शेख बशीर शेख मैनोद्दीन (वय २०) या तरुण शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून विषारी औषध घेतले. लोहा तालुक्यातील पिंपरणवाडी येथे रामजी जाधव या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन मृत्यूला कवटाळले. लेबर कॉलनी परिसरात हरिशसिंह सुंदरसिंह तेहरा (वय ३१) या शेतकऱ्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेखाली चिरडून एक अनोळखी व्यक्ती मरण पावली. हडको परिसरात किशन मारोती टरके (वय ६०) हे दोन दिवसांपूर्वी घराच्या गच्चीवर झोपले होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने ते घरात येत असताना त्यांचा तोल गेला. या वेळी गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. भरधाव वाहनाची धडक बसून श्याम थोराजी वडजे (असलगा, तालुका नायगाव) यांचा मृत्यू झाला. बळेगाव-उमरी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी ऑटोचालकाने त्यांना धडक दिली. कुंटूर पोलिसांनी याबाबत नोंद केली.