शहराजवळ, सोलापूर रस्त्यावरील वाळुंज फाटय़ावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास कंटेनरची मोटारसायकलला धडक बसून हा अपघात झाला.
दशरथ सुदाम पवार (वय २४), त्यांची पत्नी बाईजाबाई दशरथ पवार (१९) व भाऊ मनोज सुदाम पवार (२२, तिघेही रा. लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदे) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही मोटारसायकलवर (एमएच २० सीपी ३९७) नगरकडून गावाकडे जात होते. समोरून येणाऱ्या कंटेनरची (एचआर ५५ एफ ५३६) त्यांना धडक बसली. कंटेनर रस्त्याच्या चुकीच्या बाजूने जात होता, असे पोलिसांनी सांगितले. अपघात वाळुंज फाटय़ाजवळील साईराम धाब्यासमोर झाला.
पवार कुटुंबातील तिघेही मजुरी करणारे आहेत. कामानिमित्त ते नगरला आले होते. परत जाताना अपघात झाला. नगर तालुका पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. कंटेनरमध्ये चारचाकी वाहने आहेत, तो नगरकडे येत होता.